जन्मभूमीचे पालकत्व

सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून रत्नागिरीचे महाविकास आघाडीचे आमदार तथा मंत्री उदय सामंत यांची नियुक्ती झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्रात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. नियुक्तीनंतर लगेचच पालकमंत्री सामंत यांनी सिंधुदुर्गचा धावता दौरा केला. जिल्ह्राच्या ज्या तालुक्यात त्यांनी भेट दिली तिथे शिवसेनेतर्फे तसेच घटक पक्षांतर्फे त्यांचे जंगी स्वागत देखील करण्यात आले. यावेळी सामंत यांनी शुभेच्छांचा स्वीकार करीत, “अंगावर आला तर शिंगावर घेतल्याशिवाय हा पालकमंत्री गप्प बसणार नाहीअसा सूचक इशारा त्यांनी विरोधकांना दिला. तर आमदार दीपक केसरकर आणि खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्रातील विकास कामे मार्गी लावणार असल्याचे सांगितले.
आमदार उदय सामंत हे रत्नागिरी मतदार संघातून सातत्याने निवडून येत आहेत. राज्याचे उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला आहे.जिल्ह्राच्या पालकमंत्रीपदी नियुक्त होताच त्यांनी आपण सिंधुदुर्गात महिन्यातून एकदा जनता दरबार घेणार असल्याचे जाहीर केले आहे. मुळचे वेंगुल्र्याचे असलेले उदय सामंत आपल्या गावाशी, जिल्ह्राशी नाळ जोडून आहेत. हे दिसूनही येत आहे. त्यामुळे जिल्हावासियांप्रमाणेच वेंगुर्लेकरांच्या देखील आपल्या पालकमंत्र्यांकडून खास अपेक्षा आहेत. बहुप्रतिक्षित अशा मांडवी खाडी जोडणा-या झुलत्या पुलाचे काम प्रगतिपथावर आहे. येत्या काही महिन्यात मांडवी किनारा जोडणारा हा पूल कार्यान्वित होईल.
वेंगुर्ला तालुक्याबरोबरच जिल्ह्राची पुर्णत: ढासळलेली आरोग्य व्यवस्था हा सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे. तालुक्याचे ठिकाण असून देखील शासकीय आरोग्य यंत्रणेचा लाभ योग्य प्रकारे नागरिक घेत नाहीत किंवा नागरिकांना या शासकीय यंत्रणेविषयी पुरेसा विश्वास वाटत नाही ही वस्तुस्थिती आहे. ह्मदयविकाराशी संबंधित गंभीर रुग्ण असेल तर त्याला कुडाळ, गोवा अगर बेळगाव गाठावे लागते. याविषयी राजकारण बाजूला ठेवून सर्व पक्षांनी तसेच नागरिकांनी एकत्रित येऊन उपाययोजना करण्याची गरज आहे. नवनियुक्त पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वत:लक्ष घालून सध्या बांधकाम सुरु असलेले उपजिल्हा रुग्णालय लवकरात लवकर कार्यान्वित करावे व डॉक्टर्स उपलब्ध करुन द्यावेत, अशी वेंगुर्लेवासीयांची अपेक्षा आहे.
त्याबरोबरच पर्यटन विषयातील स्थगिती मिळालेले प्रकल्प देखील तात्काळ सुरु होणे आवश्यक आहे. रखडलेले चिपी विमानतळाचे काम मार्गी लावणे, तसेच किनारपट्टीवरील पर्यटन विषयक सुविधा विहित वेळेत उपलब्ध करून देणे अशी अनेक आव्हाने पालकमंत्र्यांना समोर आहेत. वेंगुल्र्यातील
पर्यटन व्यवसाय बहरण्यासाठी माजी पालकमंत्री केसरकर यांनी जाहीर केलेली बॅटरी ऑपरेटेड पाणबुडी त्वरित सुरु केल्यास येत्या पर्यटन हंगामासाठी ते मोठे आकर्षण ठरु शकेल. शासनाच्या सिंधु स्वाध्याय प्रकल्पांतर्गत वेंगुर्ला शहरात वेंगुर्ला न.प. व मुंबई विद्यापिठ संयुक्त विद्यमाने प्रस्तावित नॅशनल इन्स्टिट¬ुट ऑफ ओशिओनोग्राफीच्या अडचणी दूर करुन लवकरात लवकर हे केंद्र येथे सुरु व्हावे अशीही आशा वेंगुर्लावासीय बाळगून आहेत.
सिंधुदुर्गातील याआधीच्या जिल्हा नियोजन मंडळाच्या सभा या पालकमंत्री केसरकर, खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे यांच्यातील खडाजंगी मुळे गाजतं असत. राजकारणातील या आरोप-प्रत्यारोपामुळे मूलभूत प्रश्न ब-याचदा मागे पडायचे. आता बदललेल्या राजकीय परिस्थितीत पालकमंत्री सामंत कशाप्रकारे समन्वयाची भूमिका घेतात हे पाहणे निश्चितच औत्सुक्याचे ठरणार आहे. माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्ह्रासाठी खूप मोठ¬ा प्रमाणावर निधी आणला. “चांदा ते बांदाअशी वैशिष्ट¬पूर्ण योजना देखील कार्यान्वित केली. परंतु आपण निधी आणतो पण अधिका-यांकडून तो वेळेत खर्च होत नाही अशी खंतही ते बरेचदा कार्यक्रमातील भाषणांमधून बोलून दाखवत असत. आता नवनिर्वाचित पालकमंत्र्यांकडून या प्रशासन व्यवस्थेमध्ये बदल आणि वचक देखील जनतेला अपेक्षित आहे.
वेंगुल्र्याचा सुपुत्र सिंधुदुर्ग जिह्राचा पालकमंत्री झाला याचा आनंद वेंगुर्लेवासीयांना तर आहेच, पण बदललेल्या राजकीय परिस्थितीत उदय सामंत यांचे कौशल्य पणाला लागणार आहे. जन्मभूमीचे पालकत्व मिळालेल्या उदय सामंत यांना जिल्ह्राचे पांग फेडण्याची संधी यानिमित्ताने मिळाली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Close Menu