कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव राज्य सरकार रोखू शकत नाही तसेच कोकणातील दयनीय अवस्थे विरोधात वेंगुर्ला तालुका भाजपच्यावतीने महाविकास आघाडीच्या सरकारचा निषेध करत, काळ्या फिती व सरकारच्या विरोधातील फलक हातात घेऊन ‘आंगण ते रणांगण‘ आंदोलन तालुक्यात विविध ठिकाणी करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, साईप्रसाद नाईक, सुषमा खानोलकर, तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर, शहर अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण, नगरसेवक श्रेया मयेकर, प्रशांत आपटे, धर्मराज कांबळी, मच्छिमार नेते दादा केळुसकर, वसंत तांडेल, परबवाडा सरपंच पप्पु परब, ओंकार चव्हाण, रफिक शेख, मेहबूबशहा मकानदार, वृंदा गवंडळकर, पुंडलिक हळदणकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
आरोग्य खात्याला कोरोना सोबत लढताना आवश्यक ती यंत्रसामुग्री व निधीची शासनाने पूर्तता न केल्याने आरोग्य खातेही हतबल झाले आहे, परिणामी यंत्रणेवर ताण येण्याची स्थिती निर्माण झाल्याने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांना हतबल होऊन लेखी पत्र काढून संबंधित यंत्रणेला कळवावे लागले. राज्य सरकारचा नेतृत्वाचे याकडे होत असलेले अक्षम्य दुर्लक्षामुळे कोकणातील लोकांची दयनीय अवस्था झाली आहे, याचा निषेध करण्यासाठी व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘आंगण ते रणांगण‘ आंदोलनाचे करण्यात आल्याचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी यावेळी सांगितले. अशाप्रकारचे आंदोलन सिंधुदुर्गासाह राज्यभर करण्यात आले.