कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे शहरात ३ ठिकाणी सुरु करण्यात आलेल्या नोंदणी कक्षावर सुमारे ८०० चाकरमान्यांची नोंद झाली आहे. सदरचे नोंदणी कक्ष हे २७ जुलैपासून कार्यान्वित करण्यात आले आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-पुणे तसेच इतर जिल्ह्यातून वेंगुर्ला शहरात येणा-या नागरिकांची नगरपरिषद प्रशासनाकडे नोंद होण्यासाठी मानसीश्वर पूल, दाभोली नाका, अणसूर नाका, भटवाडी येथे नोंदणी कक्ष उभारण्यात यावेत असे नगपरिषदेच्या बैठकीत ठरविण्यात होते. त्यानुसार शहरात दाभोली नाका, अणसूर नाका, भटवाडी येथे नोंदणी कक्ष सुरु करण्यात आले आहेत. या तिन्ही ठिकाणी परजिल्ह्यातून आलेल्या सर्व लोकांची नोंदणी करण्याचे काम सुरु आहे. यासाठी न.प.तर्फे खाजगी सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे. तसेच त्यांच्यासोबत नगरपरिषद कर्मचारीही ठेवण्यात आले आहेत. सकाळी ६ ते दुपारी २, दुपारी २ रात्री १० आणि आणि रात्री १० ते सकाळी ६ याप्रमाणे नगरपरिषद कार्यालयीन व स्वच्छता कर्मचारी त्याठिकाणी २४ तास काम करीत आहेत.
प्रत्येक नोंदणी कक्षावर लोकांनी आपली नोंदणी केल्यानंतर त्यांना क्वारंटाईन कालावधीमध्ये घ्यावयाची काळजी व कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबत सूचना दिल्या जात आहेत. तसेच त्यांची ग्रामीण रुग्णालयात तपासणी झाल्यानंतर आणि तेथे त्यांची नोंदणी झाल्यावरच त्यांना संस्थात्मक किवा होम कॉरोन्टाईन करण्यात येत आहे.
परगावाहून येणारे चाकरमानी हे आपल्या बंद असलेल्या घरात कॉरन्टाईन होत आहेत. तसेच ज्या घरात १ किवा २ व्यक्ती आहेत आणि त्या घरात बाहेरुन व्यक्ती येत आहेत अशाठिकाणी त्या घरातील पूर्वीचे एक किवा दोन व्यक्ती येणा-या व्यक्तींसोबत आपणही कॉरन्टाईन होत आहेत. होम
कॉरन्टाईन असलेल्या दरवाजावर ‘घरी अलगिकरण‘ अशा आशयाचे छोटे फलक लावण्यात आले आहेत. होम कॉरोन्टाईन झाल्यानंतरही घरी जाऊन वैद्यकीय कर्मचारी सदर व्यक्तींची आरोग्य तपासणी करीत आहेत.
कोरोना विषाणू फैलावू नये यासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या सहकार्याने वेंगुर्ला न.प.ने केलेल्या या विविध उपाययोजनांना नागरिकांकडून तसेच चाकरमान्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आलेल्या व्यक्तींमधून आत्तापर्यंत एकही पॉझिटीव्ह रुग्ण सापडलेला नाही.
डॉ. राजेंद्र चव्हाण
12 Aug 2020चांगले काम करतायत.
जयराम रेडकर
12 Aug 2020एक स्तुत्य उपक्रम ! अशी सजगता हवी ! अभिनंदन !