ह्या लेखाच्या माध्यमातून आम्ही मांडत असलेले नैसर्गिक निरीक्षण शास्त्रीयदृष्ट्या तंतोतंत बरोबर असेल की नाही हे माहिती नाही. परंतु तुफानी बारदानी वा-यांच्या दिवसांमध्ये जी परिस्थिती गेल्या काही वर्षात पहावयास मिळतेय त्याची नोंद कुठेतरी रहावी म्हणून हा आमचा प्रयत्न आहे. दर्यावर्दी मच्छीमारांकडे सागरी हवामानाविषयी प्रचंड पारंपरिक ज्ञान आहे. या ज्ञानाचा उपयोग आपणास होऊ शकतो का याचा विचार कुठेतरी शासनाने करायला हवा हे सांगण्याचा मात्र आमचा उद्देश आहे. मच्छीमारांकडे पारंपरिक ज्ञानाचा अमाप खजिना आहे. भविष्यात शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये या माहितीचा समावेश झाला तर त्यात अजिबात आश्चर्य वाटायला नको.
शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये ग्रहीय वारे, पूर्वीय वारे, पश्चिमी वारे, धृवीय वारे, स्थानिक वारे, दरीय वारे, पर्वतीय वारे, खारे म्हणजेच सागरीय वारे, मतलई अर्थात भूमीय वारे असे विविध प्रकार आपल्या वाचनात आले असतील. किनारपट्टीवरील मच्छीमारांशी जर कधी तुम्ही वा-यांविषयी संवाद साधला तर त्यात अजून एका नावाची भर पडते ती म्हणजे ‘बारदानी’ वा-याची. सध्या किनारपट्टीवर बारदानी वा-यांचा मोसम आहे. पावसाळ्यात आषाढी एकादशीच्या आसपास आपणास समुद्राकडून जमिनीकडे कधी जोरदार, कधी मध्यम तर कधी हळुवार वारे वाहताना दिसतात. या वा-याला स्थानिक मच्छीमार ‘बारदानी’ म्हणतात. बारदानीचा कालावधी ४२ दिवसांचा असतो. ४२ दिवस या वा-याची झुळुक आपल्याला किनाऱ्यावर पहावयास मिळते.
भूगोलाच्या भाषेत दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्या वा-यांना खारे वारे म्हणतात. बारदानी वारेही समुद्राकडून जमिनीकडे वाहतात. परंतु बारदानी वारे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रात्रीचेही (चोवीस तास) वाहतात. त्यामुळे ह्या वा-यांना खा-या वा-यांमधील एक प्रकार मानायचा की कसे हाही प्रश्न पडतो. मच्छीमार सांगतात, बारदानी वा-यांचा वेग जास्त असतो. त्यामुळे आम्ही बारदानीला ‘तुफानी वारा’ मानतो. पावसाळ्यात आषाढी एकादशीच्या आसपास सुरू होणाऱ्या ह्या वा-याचा कालावधी ४२ दिवसांचा असतो. हा वारा व्यवस्थित झाला तर तो मासेमारी आणि घाटमाथ्यावरील शेतीलाही पोषक असतो. कारण हा वारा टिकला की, समुद्रात ‘लांबर’ म्हणजेच लहानमोठ्या लाटांच्या रांगा तयार होऊन पाण्याची चांगली घुसळण होते. या वा-याबरोबर खोल समुद्रातील मासेही किनाऱ्यालगत येतात. मच्छीमार सांगतात, जशी लाटेत सापडल्यानंतर नौका वेगाने ‘गिरी’ घेते तसे लाटांमध्ये गिरक्या घेत मासेही किनाऱ्यावर सरकत असतात. या वा-यांमुळे समुद्रात मासेमारीस जाणे मुश्कील असते. निसर्गाकडूनच एकप्रकारे मासेमारी बंदीचे फर्मान काढले जाते आणि मच्छीमारांना समुद्रातील धोकादायक स्थितीमुळे ते पाळावे लागते. याचा फायदा मत्स्यबीज वाढीस होतो. आता शेतकरी बांधवांना हा वारा मच्छीमारांच्या मते उपयोगाचा कसा असतो हे जाणून घेऊ. मच्छीमारांचे म्हणणे आहे की, हा वारा खूप उंचावरून वाहतो. त्यामुळे समुद्रात दिसणारे पावसाळी ढग पुढे सरकवण्याची ताकद त्याच्यात असते. किनाऱ्यावर आपल्याला पावसाचे काळेकुट्ट ढग दिसू लागले की, आपल्याला वाटते की आता मोठा पाऊस लागणार. बारदानी वारे पावसाचे ढग वेगाने पुढे नेतात. किनारपट्टीवर पाऊस तर पडतोच. बारदानी वा-यांमुळे किनारपट्टीवर सातत्याने पावसाच्या छोटी सरींचा खेळ सुरू असतो. बारदानीच्या दिवसांमध्ये वा-याबरोबर कोसळणाऱ्या या पावसाला स्थानिक मच्छीमार ‘करसट’ संबोधतात. काहीवेळा ‘करपटी’ वारे असाही शब्दप्रयोग केला जातो. या जोरदार बारदानी वा-यांमुळे पाऊस घाटमाथ्यावर पोहोचण्यास मदत होते. त्यामुळे वरच्या पट्ट्यात चांगला पाऊस होऊ शकतो. गतवर्षी आणि यावर्षी किनारपट्टीवर जोरदार बारदानी वारे वाहिले. गेल्या वर्षी बारदानी वा-यांच्या कालावधीत कोल्हापूर व सांगली भागात मुसळधार पाऊस होऊन महापूराचे संकट ओढवले होते. यावर्षी २ अॉगस्टपासून जोरदार बारदानी वाहत आहेत. याच कालावधीत महाराष्ट्राच्या अनेक भागात चांगला पाऊस झाला आहे. दुष्काळग्रस्त भागांमधील धरणेही पाण्याने भरली आहेत. तसेच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यातील ठराविक कालावधीत किनारपट्टीवर जोराने वाहणाऱ्या या बारदानी वा-यांचा संबंध मुसळधार पावसाशी कुठेना कुठेतरी आहे याची नोंद शासनाने घेणे गरजेचे आहे. दर्यावर्दी मच्छीमारांना त्याविषयी असलेली माहिती आणि हवामान खात्याचे शास्त्रीय अंदाज याची सांगड कुठेतरी घालण्याची गरज आहे. जेणेकरून भविष्यात आपतकालीन व्यवस्थापनासाठी आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने तयारी करता येऊ शकेल. किंबहुना पाण्याचे नियोजन करण्यासही मच्छीमारांचे पारंपरिक ज्ञान व हवामान खात्याचे शास्त्रीय अंदाज अशी दोन्ही बाजूची माहिती उपयुक्त ठरू शकेल. कारण पावसाच्या बाबतीत हवामान खात्याचा अंदाज चुकला असे जेव्हा मंत्री महोदय वृत्त वाहिन्यांसमोर येऊन सांगतात तेव्हा आम्हालाही वेदना होतात.
बारदानी वा-यांविषयी अजून थोडेसे…..
बारदानी वा-यांना सुरूवात होते तेव्हा किनारपट्टीवर जोराचा पाऊस होतो. सध्या गोवा, मुंबईसह कोकणातील सर्वच जिल्ह्यात प्रचंड पाऊस कोसळला आहे. किनारपट्टीपासून काहीशा लांब असलेल्या गावांमध्ये पूर परिस्थिती आहे. बारदानी वा-याची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे (ईशान्येच्या दिशेने) अशी असते. त्यामुळे लाटांची उंची तुलनेने कमी असते. मात्र समुद्रात लहानमोठ्या लाटा ज्याला ‘लांबर’ म्हणतात त्यांची निर्मिती होत असते. अशा वातावरणात मासेमारीस नौका घेऊन जाणे अशक्य होऊन जाते. गतवर्षीप्रमाणे याही वर्षी बारदानी वा-यांनी मत्स्य हंगामाच्या सुरूवातीलाच जोर केल्याने मच्छीमारांना मासेमारी सुरू करता आलेली नाही. बारदानी वा-यांचा जोर अद्याप कायम आहे. जास्तकरून उंचीवरून वाहणारे हे वारे माडांच्या झावळात घुसल्यावर सुरू होणारे निसर्गाचे संगीत किनारपट्टीवर येणाऱ्या एखाद्या नवख्या व्यक्तीला घाबरवून सोडते. मात्र गेली कित्येक वर्षे पिढ्यापिढ्या ह्या वा-याला सरावलेल्या मच्छीमारांना हा वा-याची तितकीशी काळजी वाटत नाही. तरीपण एखाद्यावेळी जोरदार बारदानीमुळे घरा सभोवताली डोलणा-या माडांची भिती मनात असतेच. रात्रीचे बारदानी वारे जोरदार वाहु लागले की, काहीजण बारदानी ढील होईपर्यंत जागे राहतात. त्यांची झोप उडते. त्यामुळे झोप उडवणारे वारे म्हणूनही या वा-यांची ओळख आहे. नेऋत्य मान्सून वा-यांमध्ये एखाद्या वादळाचा व्यत्यय आल्यावर जसा मान्सूनच्या आगमनावर परिणाम होतो तसाच बारदानी वा-यांमध्येही या वादळांमुळे खंड पडतो. बारदानी वा-यांमुळे खवळणा-या समुद्रामुळे किनाऱ्यापट्टीचीही मोठी धूप होते. – महेंद्र पराडकर, 9421236201