महाराष्ट्र कोविडमुक्त करण्यासाठी एकत्र येऊन लढण्याच्या उद्देशाने ‘माझे कुटुंब -माझी जबाबदारी‘ ही मोहीम राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. वेंगुर्ला तालुक्यातील या मोहिमेचा शुभारंभ तुळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पंचायत समितीचे सभापती अनुश्री कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
या शुभारंभप्रसंगी पंचायत समिती सदस्य यशवंत परब, तुळस सरपंच शंकर घारे, तालुका आरोग्य अधिकारी अश्विनी माईणकर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी जुन्नरे आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते. तालुक्यातील उर्वरित सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रातिनिधिक स्वरूपात तेथिल लोकप्रतिनिधींच्या उपस्थित त्या त्या ठिकाणी या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
सध्या वाढत चाललेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून हे अभियान हाती घेतले आहे. १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर हा या अभियानाचा पहिला टप्पा तर १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर हा दुसरा टप्पा आहे. या अभियानात घरोघरी सर्व्हे करुन अजून बाहेर न पडलेले रुग्ण शोधून त्यांना उपचारापर्यंत आणण्यात येणार आहेत. एखाद्या व्यक्तीमध्ये ताप, खोकला, दम लागणे, ऑक्सिजन लेव्हल कमी होणे अशी कोविडसदृश्य लक्षणे आढळल्यास त्याची फिवर क्लिनिकमध्ये कोरोना चाचणी करुन पुढील उपचार करण्यात येणार आहेत. ५ ते १० पथकांमागे १ डॉक्टर सेवा देणार आहे. यासाठी आरोग्य विभाग तसेच ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे, त्यादृष्टीने ग्रामपंचायत स्तरावर टेम्परेचर गन ऑक्सिमिटर आदी वस्तू आवश्यक त्या प्रमाणात संबधित पाथमिक आरोग्य केंद्र उफद्र यांच्यासाठी उपलब्ध करुन देण्याची विनंती केली. तरी राज्य शासनाच्या या मोहिमेत सर्वांनी सक्रिय सहभागी होऊन कोरोना विरुद्धच्या लढ्याला बळ द्यावे असे आवाहन सभापती कांबळी यांनी केले.
या मोहिमेची माहिती तालुक्यातील आरोग्य विभाग, सरपंच, ग्रामसेवक यांना समजण्यासाठी पंचायत समिती वेंगुर्ला येथे व्हिडीओ काँन्फरन्सद्वारे मार्गदर्शन बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य नितिन शिरोडकर, उपसभापती सिद्धेश परब, माजी सभापती यशवंत परब, तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, आरोग्य विभागाने अधिकारी, विविध खात्यांचे अधिकारी सहभागी झाले होते.