शहरात वेंगुर्ला नगरपरिषद, प्रशांत सर्व्हेर व भूमी अभिलेख यांच्यामार्फत सुरु असलेल्या सिटी सर्व्हे अंतर्गत भूमी अभिलेखच्या सर्व्हेला येथील कुबल बंधूंनी हरकत घेतली असून होत असलेल्या चुकीच्या सर्व्हेबाबत नगराध्यक्ष दिलीप गिरप यांचे लक्ष वेधले आहे. महसूल दप्तरी मालकी खात्याप्रमाणे, सर्व्हे नियमाप्रमाणे जाग्यावर जाऊन हद्द ठराव करुन सर्व्हे व्हावा अशी विनंतीही यावेळी कुबल बंधूंनी निवेदनाद्वारे केली आहे.
वेंगुर्ला शहरात सुरु असलेला सिटी सर्व्हेबाबत प्रशांत सर्व्हे व भूमी अभिलेख यांचा अनागोंदी कारभार सुरु असून याकडे येथील कुबलवाडा, गाडीअड्डा व अन्य काही ठिकाणचे जमिन मालक कुबल बंधू यांनी एकत्र येत याबाबत नगराध्यक्ष गिरप यांच्याशी चर्चा केली. तर सिटी सर्व्हे अंतर्गत होणा-या भूमी अभिलेखच्या सर्व्हेला आपली हरकत असल्याबाबत निवेदन नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना दिले आहे. या सर्व्हे मध्ये सर्व नियम बाजूला ठेऊन एका जागी बसून लोकांना बोलावून त्यांच्याकडून माहिती घेऊन हा सर्व्हे पूर्ण केला जात आहे. वास्तविक पाहता नियमाप्रमाणे त्या त्या जाग्यावर जाऊन सर्व्हे करुन ठराव होणे अपेक्षित आहे. मात्र असे होत असल्याने हे काम त्वरित थांबवून नियमानुसार सर्व्हे करावा. तसेच आम्हा कुबल घराण्यांच्या येथील गाडीअड्डा, कुबलवाडा व अन्य ठिकाणी अनेक जमिन मिळकती आहेत. त्यामुळे महसूल दप्तरी मालकी खात्याप्रमाणे, सर्व्हे नियमाप्रमाणे जाग्यावर जाऊन हद्द ठराव करुन सर्व्हे व्हावा असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी जेष्ठ नेते शिवाजी कुबल, जिल्हा बँक माजी संचालक नितीन कुबल, माजी नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल, चेतन कुबल, ओंकार कुबल, सचिन वालावलकर, शिवप्रसाद कुबल, सौरभ कुबल, वारीश कुबल, भाऊ कुबल यांच्यासाहित इतर कुबल बंधू उपस्थित होते.
याबाबत भूमिअभिलेख उपअधिक्षक व प्रशांत सर्व्हे यांना पत्र पाठवून याबाबत उपपयोजना करण्यात येतील असे आश्वासन नगराध्यक्ष गिरप यांनी यावेळी दिले. दरम्यान या बैठकीला मुख्याधिकारी उपस्थित असणे आवश्यक होते. मात्र आपण खासगी कामासाठी बाहेर गेलो असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत माजी नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत नगराध्यक्ष यांना कोणतीही लेखी सूचना न देता खासगी कामासाठी बाहेर कसे काय जातात असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच भूमी अभिलेख व प्रशांत सर्व्हे यांच्या मनमानी कारभराबात पालकमंत्री उदय सामंत व आमदार दीपक केसरकर यांचे येत्या ४ दिवसात लक्ष वेधणार असून याबाबत संबंधीत जमीन मालक लगतचे जमीनदार यांना विश्वासात घेऊन सर्व्हे करण्यात यावा असेही प्रसन्ना कुबल यांनी सांगितले आहे.