►४९ उमेदवारांचे भवितव्य मतदानपेटी बंद

आरवलीत ७५.५२ टक्के तर सागरतीर्थ येथे ७३.६३ टक्के मतदान : १८ जानेवारी रोजी मतमोजणी

वेंगुर्ला तालुक्यातील आरवली व सागरतीर्थ ग्रामपंचायतीसाठी एकूण ६ मतदान केंद्रातून ७४.५९ टक्के मतदान पार पडले. एकूण ३३७७ पैकी २५१९ एवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून दोन्ही ग्रामपंचायतीच्या ४९ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान पेटीत बंद झाले. १८ जानेवारी रोजी वेंगुर्ला तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे.

      वेंगुर्ला तालुक्यातील एकूण ३० ग्रामपंचायतीपैकी आरवली व सागरतीर्थ या दोन ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पाडली. आरवली ग्रामपंचायतीच्या प्रभाग १ मधील जीवन शिक्षण शाळा आरवली नं.१ (पूर्व भाग) मध्ये ४७४ पैकी ३४९, प्रभाग २ मधील जीवन शिक्षण शाळा आरवली नं.१ (पश्चिम भाग)मध्ये ६०२ पैकी ४८१, प्रभाग ३ मधील पूर्ण प्राथमिक मराठी शाळा आरवली-सोन्सुरेमध्ये ६३६ पैकी ४६३ असे मिळून एकूण १७१२ पैकी १२९३ मतदारांनी मतदानाचा हक्क बाजावल्याने येथे ७५.५२ टक्के एवढे मतदान झाले.

      सागरतीर्थ ग्रामपंचायतीच्या प्रभाग १ मधील सरस्वती विद्यालय आरवली टांक (उत्तर भाग) मध्ये ६१३ पैकी ४३५, प्रभाग २ मधील जिल्हापरिषद पूर्ण प्राथमिक शाळा आरवली टांक मध्ये ४७८ पैकी ३३२, तर प्रभाग ३ मधील सरस्वती विद्यालय आरवली टांक (दक्षिण भाग) मध्ये ५७४ पैकी ४५९ असे मिळून एकूण १६६५ पैकी १२२६ मतदारांनी मतदानाचा हक्क बाजावल्याने येथे या मतदान केंद्रावर ७३.६३ टक्के एवढे मतदान झाले.

      दोन्ही ग्रामपंचायतीच्या मतदान केंद्रावर आज सकाळ पासूनच मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती. सकाळच्या सत्रात आरवली ग्रामपंचातीसाठी ४३.७५ टक्के मतदान तर सागरतीर्थ ग्रामपंचायतीसाठी ४७.७५ टक्के मतदान झाले होते. सागरतीर्थ ग्रामपंचायतीच्या प्रभाग ३ मध्ये ७९.९६ टक्के एवढे सर्वात जास्त मतदान झाले तर याच ग्रामपंचायतीच्या प्रभाग २ मध्ये सर्वात कमी म्हणजे ६९.४५ टक्के एवढे मतदान झाले.

Leave a Reply

Close Menu