जनतेच्या ऋणाची परतफेड विकासातूनच करणार!- नारायण राणे

वेंगुर्ल्यातील जुन्या मच्छिमार्केटच्या ठिकाणी नागरिकांची अनेक वर्षापासून असलेली व गरजांचा विचार करुन बांधण्यात आलेल्या सागररत्न मत्स्य बाजारपेठेचे लोकार्पण सोहळा केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे व माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ११ जुलै रोजी ऑनलाईन पद्धतीने झाले.

      नूतन मच्छिमार्केटच्या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात व्यासपिठावर खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार रविद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, नगराध्यक्ष दिलीप गिरप, सिधुदुर्ग जिल्हा नगरपरिषद प्रशासन अधिकारी वैभव साबळे, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास गावडे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हापरिषद सदस्य दादा कुबल, तहसिलदार प्रविण लोकरे, मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, नगरसेवक साक्षी पेडणेकर, प्रशांत आपटे, सुहास गवंडळकर, प्रकाश डिचोलकर, शितल आंगचेकर, शैलेश गावडे, कृतिका कुबल, विधाता सावंत, कृपा मोंडकर, नागेश गावडे, स्नेहल खोबरेकर, धर्मराज कांबळी, श्रेया मयेकर, पूनम जाधव, आत्माराम सोकटे आदी उपस्थित होते.

      बाजारपेठ ही नागरी सुविधा आहे. बाजारपेठ कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे वेंगुर्ल्याचे मच्छिमार्केट आहे. नागरी सुविधा होत असताना दरडोई उत्पन्न कसे वाढेल याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने लक्ष द्यावे. जनतेच्या ऋणाची परतफेड विकासातूनच करणार असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.

      प्रगत देशातील बाजारपेठांसारखे वेंगुर्ला मच्छिमार्केटचे काम झाले आहे. हे मच्छिमार्केट वेंगुर्ल्याच्या सौंदर्यात भर टाकणारे असून ही बाजारपेठ मैलाचा दगड ठरणारी आहे असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगताना ८० टक्के उद्योग राणेंकडे येतात. त्यामुळे कोकणच्या विकासाला गती देण्याचे काम नारायण राणे यांच्या हातून होणार आहे. विकासकामांसाठी माझी नेहमी मदत राहिल असेही ते म्हणाले.

      वेंगुर्ला शहराची ओळख मच्छिमार्केट आहे. वेंगुर्ल्यातील हा मच्छिमार्केटचा प्रकल्प पाहून अभिमान वाटतो. मच्छिमार्केट नसून ते मॉल असल्याचा भास होतो. निधीचा उपयोग कसा करायचा हे त्यांनी योग्यरितीने दाखवून दिले असल्याबाबत आमदार नितेश राणे यांनी गौरवोद्गार काढले. तर दोन्ही पक्षांचे मंत्री एकाच व्यासपिठावर पाहून नक्कीच युतीची चर्चा होणार असल्याचेही ते म्हणाले.

      वेंगुर्ल्याची ही श्रीमंती कायम राखण्यासाठी लोकप्रतिनिधींनी ठामपणे उभे रहावे. वेंगुर्ल्याला काही कमी पडू देणार नाही असे सांगताना मच्छिमार्केट बांधताना ऐतिहासिक परंपरा जपल्याबद्दल खासदार राऊत यांनी आर्किटेक्चरचे कौतुक केले. भूमिगत विजवाहिन्या प्रकल्प राबविणारी वेंगुर्ला ही पहिली नरगपरिषद असल्याचेही त्यांनी सांगितले.

      संघर्षानंतर ही वास्तू उभी राहिली आहे. मच्छीच्या घाण पाण्यावरही प्रक्रिया करण्याचे नियोजन केले आहे. ५ वर्षात जे जे योजिले होते ते ते लोकप्रतिनिधींच्या मानसिकतेमुळे पूर्ण झाले असल्याचे रविद्र चव्हाण यांनी सांगितले.  मच्छिमार्केट बांधकामावेळी व्यापा-यांनी केस घातली. त्यामुळे काम रखडल्याने २ कोटी निधी परत गेला. हा गेलेला निधी पुन्हा देण्याचे काम देवद्र फडणवीस यांनी केले. त्यासाठी रविद्र चव्हाण यांनीही पाठपुरावा केला. काम करताना दृष्टी चांगली लागते आणि ती दृष्टी येथे मिळाल्याने ही वास्तू उभी राहिली. मिळालेल्या निधीचा उपयोग योग्य झाला आहे. यापुढे या वास्तूत चांगला व्यापार व्हावा असे आमदार केसरकर यांनी सांगितले.

      या कार्यक्रमावेळी विनायक राऊत दीपक केसरकर, रविद्र चव्हाण, नितेश राणे, राजन तेली, विलास गावडे, वैभव साबळे, आर्किटेक्चर अमित कामत, कोर्टक-यांमध्ये नगरपरिषदेची बाजू मांडणारे अॅड.श्याम गोडकर, कॉन्ट्रक्टर एस.एल.ठाकूर, आर्टीस्ट सुनिल नांदोस्कर, इलेक्ट्रीशियन विनित पांगम, नगरअभियंता अभिषेक नेमाणे, खगोलशास्त्राची माहिती असणारा तुळसचा सुपुत्र कु. विजय तुळसकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत नगराध्यक्ष दिलीप गिरप, सूत्रसंचालन नगरसेवक प्रशांत आपटे तर आभार मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu