वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २०२१-२२ स्वच्छता व पर्यावरण संवर्धन मोहिमे अंतर्गत ‘ध्यास स्वच्छतेचा‘ हे पथनाट्य शहरात सादर करण्यात आले. या पथनाट्याद्वारे नागरिकांना स्वच्छता संदेश देण्यात आले.
केंद्र शासनामार्फत सन २०२१-२२ हे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्ष म्हणून साजरे करण्याचे आदेश नगरपरिषद व नगरपंचायत यांना प्राप्त झाले आहेत. त्यानुसार ‘आझादीका अमृत महोत्सव‘ ही स्वच्छता व पर्यावरण संवर्धन मोहीम राबवली जात आहे. या अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत दि.२६ जुलै ते दि.२ ऑक्टोबर या कालावधीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २०२१ या अभियान अंतर्गत विविध उपक्रम हाती घेतले आहेत. याचाच एक भाग म्हणून गुरुवारी ‘ध्यास स्वच्छतेचा‘ हे पथनाट्य शहरात सादर करण्यात आले.
शहरातील सागररत्न मत्स्य बाजारपेठ येथे तसेच दाभोली नाका येथे सखी स्वयंसहाय्यता महिला बचत गट खांबड-भटवाडी, वेंगुर्ला यांच्या मार्फत हे स्वछता संदेश देणारे पथनाट्य सादर करण्यात आले. या पथनाट्यात शहरात स्वछता ठेवा, उघड्यावर कचरा टाकू नका, नगरपरिषदेने दिलेल्या कचरा पेटीचा वापर करुन कचरा वर्गिकरण करा व घंटागाडीत तो कचरा द्या अशा प्रकारचे अनेक संदेश देण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, गटनेते प्रकाश डिचोलकर, नगरसेवक शितल आंगचेकर, धर्मराज कांबळी यांच्यासह नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या पथनाट्याचे नियोजन नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल, सहाय्यक प्रकल्प अधिकारी विलास ठुंबरे, शहर समन्वयक सुश्मित चव्हाण, समूह संघटक अतुल अडसूळ यांनी केले.