रत्नागिरी जि.प.च्या पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ अंतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाबाबत रत्नागिरीच्या मुख्यकार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालकांसह १२४ अधिका-यांनी १३ डिसेंबर रोजी वेंगुर्ला न.प.ला भेट देऊन सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाबाबत माहिती घेतली. यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, प्रकल्प संचालक नंदीनी घाणेकर यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील ९ तालुक्याचे गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे कार्यकारी अभियंता व शाखा अभियंता तसेच बीआरसी, सीआरसी असे १२४ अधिकारी उपस्थित होते.
या सर्व अधिकारी वर्गाचे नगराध्यक्ष दिलिप गिरप यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर झालेल्या चर्चासत्रात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी घनकचरा व्यवस्थापन, आयआयटी मुंबईचे योगेश राऊत यांनी सांडपाणी व्यवस्थापन, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे संकेत थोरात यांनी डीपीआर तयार करण्याच्या पद्धती व सादरीकरण यावर मार्गदर्शन केले. त्यानंतर कॅम्प येथील स्वच्छ भारत पर्यटनस्थळास भेट देऊन सविस्तर माहिती घेतली.