वेंगुर्ल्यातील पाणीबाणीवर मात…!

वेंगुर्ला शहरातील पाणी प्रश्‍नावर अनेकदा वृत्तपत्रात रकानेच्या रकाने लिहून आले आहेत. मोठ्या प्रमाणावर पाऊस पडून आणि निशाण तलावासारखे धरण असूनही मार्च-एप्रिल-मे महिन्यात शहरवासीयांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. पाण्यासाठी वणवण भटकावे लागते ही शोकांतिका त्यात मांडली जायची. भरीस भर अगदी जानेवारी महिन्यापासूनच एक दिवस आड सुरु झालेले नळपाणी योजनेचे पाणी मार्च-एप्रिल महिन्यांपर्यंत दोन ते तीन दिवस आड पुरविले जायचे. त्यात काही ठिकाणी तर उंचसखल भागामुळे पाणी पुरवठा टँकरने करावा लागायचा. असे हे भिषण पाणीबाणीचे चित्र 2020 पासून पालटू लागले आहे. मार्च ते मे महिन्यात पाण्यासाठी होणारी वणवण, प्रसंगी मैलोनमैल होणारी पायपीट यामध्ये खंड पडला आहे. विहिरींनी तळ गाठल्यानंतर वाड्यावाड्यांमध्ये दिसणारे पाणी पुरवठ्याचे टँकर दिसून आले नाहीत. अर्थातच ही सुखावह जादू एका रात्री झालेली नाही. दीर्घकाळ यावर काम सुरु असले तरी माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्राधान्याने लक्ष घालून नेमके पाणी मूरते कुठे यावर अभ्यास करीत मार्ग काढला. पाण्याचे हे इतकी वर्ष न सुटलेले कोडे 2016 पासून कार्यरत असलेल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी सोडविण्याचा केलेल्या यशस्वी प्रयत्नाचा हा घेतलेला आढावा.

      दुष्काळाची तीव्रता नैसर्गिक आपत्ती जरुर आहे. परंतु त्याला आपली नियोजनशुन्यता तेव्हढीच जबाबदार आहे. खरेतर पावसाचे पाणी साठविणे आणि जिरविणे यासाठी 40 वर्षांपूर्वी वसंतदादा पाटील यांनी ‘पाणी अडवा – पाणी जिरवा‘ असा संदेश देऊन मोहिम राबविली होती. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी हरित महाराष्ट्र आणि अन्नधान्य स्वयंपूर्ण होण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले होते. एवढेच कशाला 100 वर्षापूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी शेती, उद्योग, पाणी साठविण्याच्या योजना यासाठी केलेले ऐतिहासिक काम आजही मार्गदर्शक ठरणारे आहे. कोकणातील मंडळी म्हणतात, आपल्याकडे दुष्काळ कुठे आहे? तो तर मराठवाडा, विदर्भात आहे. आम्हाला काय त्याचे? पण दुष्काळाचे चटके कोकणवासीयांना देखील अप्रत्यक्ष भोगावे लागतातच. आपल्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या भाज्या, कांदे, बटाटे, इतर किराणा माल यासारख्या जीवनावश्‍यक वस्तूंच्या किंमती अवास्तव वाढलेल्या आहेत. कोकण व्यतिरिक्त भागात निर्माण झालेल्या ओल्या किंवा सुक्या दुष्काळामुळे भाजांच्या उत्पादनात प्रचंड तुट निर्माण होते. अपुऱ्या होणाऱ्या भाजांच्या किंमती गगनाला भिडू लागतात. महागाई हा जसा काही दलालांच्या स्वार्थाचा परिणाम आहे. तसा तो उत्पादनात घट होणे याचाही परिणाम आहे. याची जाणिव ठेऊन पाण्याचा थेंब थेंब आपणा सर्वांसाठी किती महत्त्वाचा आहे हे आपल्या लक्षात येईल.

      आपल्या वेंगुर्ला शहराचा विचार करता, जानेवारी महिन्यापासून शहरामध्ये पाणी पुरवठा हा दोन दिवस आड तर काही ठिकाणी टँकर फिरवावा लागत असे. ही स्थिती गेल्या चार वर्षात सुखावह बदलली. निशाण तलावासारखे मोठे धरण असूनही अशी स्थिती का? हा प्रश्‍न दरवर्षी पाणी पुरवठा अनियमित सुरु झाला की पुन्हा उपस्थित होत असे. परंतु, वेंगुर्ल्यात भीषण दुष्काळाची स्थिती जरी निर्माण झाली नसली तरी जोराचा पाऊस पडल्यानंतर काही भागांमध्ये निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईचे हाल मात्र विसरले जायचे. 2016 मध्ये एप्रिल-मे महिन्यात शहरात टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी राजकीय पुढारी आणि सामाजिक संस्थांमध्ये चढाओढ निर्माण झाली होती. 2017 ते 2019 या कालावधीत दरवर्षीप्रमाणे नगरपरिषदेतर्फे देण्यात आलेल्या अनुदानातून तसेच लोकसहभागातून सुंदरभाटले आणि राऊळवाडा येथे कच्चे बंधारे घालण्यात आले. तर लघुपाटबंधारे तर्फे भटवाडी येथे कायमस्वरुपी बंधारा बांधण्यात आला. यामुळे विहिरींच्या पाणी साठ्यात वाढ झाली तरी मे 2019 पर्यंत भूगर्भातील पाणीसाठा कमीच राहिल्याने टंचाईची तीव्रता कमी झाली नव्हती. त्यामुळे जलसंधारणाच्या कामामध्ये सातत्य ठेवण्याचे उद्दिष्ट 2016 मध्ये निवडून आलेल्या कौन्सिलने कायम ठेवले होते आणि त्यादृष्टीने त्यांची वाटचाल सुरु होती. यासाठी त्यांनी सर्वप्रथम वेंगुर्ल्याची पाणी स्थिती आणि साठविलेल्या पाण्याद्वारे होणारा पाणी पुरवठा याचा सखोल अभ्यास केला.

      पूर्वी ब्रिटीश काळात वेंगुर्ला शहराला नारायण तलाव तसेच खाजगी विहिरींमधून पाणी पुरवठा होत असे. कालांतराने शहराची व्याप्ती कॅम्प, भटवाडी, वडखोल ते अगदी रामघाटपर्यंत वाढली. या विस्तारीत भागातील नागरिकांना देखील खाजगी विहिरींमार्फत पाणी पुरवठा होत असे. पुढे स्वातंत्र्यकाळात नारायण तलाव देखभालीच्या दृष्टीने दुर्देवाच्या फेऱ्यात अडकल्याने तेथून होणारा पाणी पुरवठा बंद झाला. तोपर्यंत वडखोल येथील भाग शहरात समाविष्ट झाला होता. 1990च्या सुमारास तत्कालीन प्रशासन, नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्या प्रयत्नाने समुद्रसपाटीपासून सुमारे 900 मिटर उंचावरील डोंगराळ भागात असलेला नैसर्गिक निशाण तलावातून पाणी पुरवठा योजना शहरामध्ये यशस्वीरित्या राबविली गेली. सन 2010 पर्यंत ही सेवा विनाअडथळा सुरु होती. कोणतेही व्यवस्थेचे दीर्घकालिन लाभ हवे असतील तर त्यामध्ये काळानुसार बदल, देखभाल, डागडुजी आवश्‍यक असते. परंतु, तसे कोणतेही भरीव प्रयत्न 2017 पर्यंतच्या काळात झाले नव्हते.

      निशाण तलावाचे पाणी जलशुद्धीकरण केंद्रावरील टाकीत येऊन गुरुत्वाकर्षण प्रक्रियेद्वारे शहरात सोडले जाते. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीची क्षमता 7 लाख लिटर एवढी असली तरी 1980 सालामध्ये बांधलेल्या या पाण्याच्या टाकीच्या क्षमतेमध्ये 2017 सालापर्यंत कोणताही बदल अगर क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न झाले नव्हते. 1990 साली 64 सार्वजनिक नळ जोडण्यांद्वारे पाणी पुरवठा व्हायचा. सन 2004 पासून मिटर लावून घरगुती नळजोडण्यांद्वारे पाणी पुरवठा सुरु झाला. मिळालेल्या माहितीनुसार 64 कनेक्शनवरुन नळ धारकांची संख्या 1350 हून अधिक झाली आहे. ऐन एप्रिल-मे महिन्यात शहरातील पर्यटन, हॉटेल्स, घरोघरी येणारे चाकरमानी यामुळे भरपूर प्रमाणात पाणी पुरवठा उपलब्ध करुन देणे नगरपरिषदेला अनिर्वाय होते. ज्यावेळी निशाण तलावातील पाणीसाठा कमी व्हायचा त्यावेळी अग्नीशमन केंद्राजवळील जुनी विहिर, कंपोस्ट डेपोमधील बोअरवेल तसेच इतर खाजगी विहिरींमधून ते टँकरद्वारे शहरात पुरविले जाई.

      दिवाळीपर्यंत परतीचा पाऊस पडून सुद्धा वेंगुर्ला शहराला पाणीपुरवठा का होत नाही किवा पाणीटंचाई का होते? यासाठी एप्रिल 2017मध्ये पाणी पुरवठा विभाग कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने नगराध्यक्ष दिलीप गिरप, नगरसेवक प्रशांत आपटे व साप्ताहिक किरातच्या टीमने सर्वे करीत ‘पाणी टंचाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट‘ ‘किरात‘ मधून प्रसिद्धही केला होता. त्यावेळी पाणी साठवणूक क्षमता आणि पाणी वितरण व्यवस्था यामध्ये निदर्शनास आलेल्या समस्यांना नगरपरिषदेने सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याने 2017 पासून टँकरमुक्त वेंगुर्ल्याचे चित्र दिसू लागले.

      पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जीर्ण आणि कमकुवत झाली असल्याने फार मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होऊन पाणी वाया जात असे. यासाठी पाईपलाईन दुरुस्ती हाच एकमेव उपाय होता. पण अन्य तात्पुरता उपाय करण्यापेक्षा भविष्यातही नागरिकांना या समस्येला तोंड द्यावे लागू नये म्हणून पाईपलाईन बदलण्याचे काम नगरपरिषदेने ऐरणीवर घेऊन पूर्ण केले. नगरपरिषदेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पाईपलाईन बदलण्याच्या कामाला नगरविकास महासंचालनालय विभाग मुंबई, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांची मान्यता मिळाली आणि हे काम सुरु झाले. सुमारे 40 वर्षांपूर्वीच्या जुन्या 60% पाईपलाईन बदण्यात आल्या. त्यामुळे जीर्ण झालेल्या पाईपलाईनमधून वाया जाणारे पाणी बंद झाले. तसेच जुन्या पाईपलाईनवरचे वॉल्व्ह बदलण्यात आल्यामुळे विविध भागात पाणीपुरवठा करण्याचे नियोजन सुरळीत झाले. तर वेशी भटवाडी येथील उंच भागात कमी दाबाने नळ पाणी पुरवठा होत असल्याने तेथे 2017 पर्यंत टँकरने पाणी पुरवठा करावा लागत असे. यावर उपाय म्हणून 1 लाख लिटर पाण्याची टाकी व विहिर आदी कामे मंजूर करुन ती पूर्णत्वासही नेली. हा प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित झाल्याने याठिकाणी पाणी टंचाई भासली नाही.

      कॅम्प येथील अग्निशामक केंद्राजवळील 2 लाख लिटर पाण्याची टाकी व विहिरी यांचे कामही पूर्ण झाले. नारायण तलावाच्या जवळील असलेल्या विहिरीची खोली वाढविल्याने निमुसगा येथे असणाऱ्या 1 लाख लिटर पाण्याची टाकी रोज भरण्यात येऊ लागली. गाडीअड्डा येथील 50 हजार लिटर पाण्याच्या टाकीजवळ नविन विंधन विहिर (बोअरवेल) खोदून या बोअरवेलचे पाणी त्या टाकीत भरण्यात येऊ लागले. जलशुद्धीकरण केंद्राजवळील पाण्याच्या टाकीची क्षमता 7 लाख लिटर एवढी आहे. नगरपरिषदेच्या प्रयत्नांनी इतर तीन टाक्यांचे बांधकाम पूर्ण झाल्याने पाणी साठवणूक क्षमता 10.5 लाख लिटर एवढी वाढली. मार्च ते मे या पाणी टंचाईच्या कालावधीत उपलब्ध पाणी साठ्याचे नियोजन करुन ते सर्वांना समान पाणीपुरवठा करत असतानाही नगरपरिषदेला थकबाकीदार आणि चोरुन पाणी वापरणाऱ्यांपासून बराच त्रास होत होता. याचा सर्व्हे करुन संबंधितांना याची कल्पना देऊन नाईलाजास्तव नगरपरिषदेने काही कनेक्शने 2020 मध्ये कायमची बंद केली.

      या सर्व उपयांबरोबरच शहर कायमचे पाणी टंचाई मुक्त करण्यासाठी निशाण तलाव धरणाची उंची वाढविणे आवश्‍यक असल्याने सप्टेंबर 2019 मध्ये धरणाची उंची अडीच मिटरने वाढवण्याचा कार्यारंभ आदेश मिळवण्यात नगरपरिषदेला यश मिळाले. त्यामुळे प्रति माणशी किमान 70 लिटर पाणी देणे बंधनकारक असलेल्या नगरपरिषदेला भविष्यात 135 लिटर प्रति माणशी पाणी देण्याचा मानस आहे. हे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सिंधुदुर्गनगरी यांच्यावतीने पूर्ण करण्यात आले. पुढील 25 ते 30 वर्षांचे नियोजन करुन नगरपरिषदेने उपाययोजना केल्या असल्या तरी नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करणे आवश्‍यक आहे. नगरपरिषद पुरवत असलेले पाणी त्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करुन नळाद्वारे लोकांच्या घरापर्यंत येते. या पाण्याचा झाडांना शिंपण्यासाठी, गाड्या धुण्यासाठी वापर अपेक्षित नाही. लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून जमिनीखाली पाण्याची पातळी वाढविण्याच्या दृष्टीने सामाजिक संस्था व शासन यांनी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. असे न केल्यास वाढती लोकसंख्या व शहरीकरण यामुळे 25 ते 30 वर्षानंतर पुन्हा टँकरयुक्त वेंगुर्ला दिसण्यास वेळ लागणार नाही. याचबरोबर ब्रिटीशकालीन नारायण तलावाचे पुनरुज्जीवन होण्यासाठी शासन स्तरावर योग्य पाठपुरावा होणे गरजेचे आहे.

      वेंगुर्ला पाणी पुरवठा योजना अव्याहतपणे सेवेत रहाण्यासाठी योग्य वेळी देखभाल दुरुस्ती होणे तेवढेच गरजेचे आहे.

      तात्पुरत्या उपाययोजनांवर भर न देता उन्हाळ्यातील भिषण पाणीबाणीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी पाणी पुरवठ्याची सद्यस्थिती सुधारण्यासाठी नगरपररिषदेने केलेले काम शहरवासीयांसाठी अभिमानास्पद आणि दीर्घकाळ दिलासा देणारे ठरले आहे.                                                         -सीमा मराठे, 9689902367

Leave a Reply

Close Menu