खोके कमवणा-यांनी धोके दिले आहेत. त्यांच्यातील बेरोजगारी दूर झालेली आहे. पण महाराष्ट्रातील बेरोजगारी कुठेच कमी झालेली नाही तर ती वाढतच चालली आहे. महाराष्ट्रातील एमआयडीची ओसाड होत चालल्या आहेत. कंपन्या बंद पडत चालल्या आहेत. त्यातही काही चांगल्या कंपन्या आहेत त्या गुजरातला पाठवत आहेत. भाजपाचे गुजरात प्रेम आपल्याला भारी पडत चाललय. महाराष्ट्राच्या हक्काचा घास खेचून गुजरातच्या घशात घालण्याचे काम सुरू आहे. गद्दारांनी महाराष्ट्र लुटला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी परिवर्तन घडविणे आवश्यक आहे. राजन तेली यांनी तुम्ही शिवसेनेत येऊन आमची मनं जिकलीत आता निवडणुक जिकण्यासाठी त्यांना सर्वांनी साथ द्या असे आवाहन उबाठा शिवसेनेचे युवा नेते तथा माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी वेंगुर्ला येथे केले.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे महविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्या प्रचारार्थ वेंगुर्ला येथे रविवारी जाहीर सभा संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. ठाकरे पुढे म्हणाले, आज कोकणात चांगले प्रकल्प आणावयाचे असतील तर मविआचे सरकार येणे आवश्यक आहे. कोकणातील आंबा, काजू उत्पादनाला जागतिक दर्जावर न्यायचे आहे, त्यासाठी आपले हक्काचे सरकार पाहिजे. येथील शालेय शिक्षणमंत्री शिक्षणाचा दर्जा वाढवू शकले नाहीत. त्यामुळे या भागातील बेरोजगारांना काम द्यावयाचे आहे. आपले सरकार आल्यावर लाडक्या बहिणींना महिना ३००० रुपये देणार, महिलांसाठी मोफत एसटी प्रवास, व्यापक प्रमाणावर महिला पोलीस भरती, प्रत्येक बेरोजगारीला महिना ४००० रुपये आपले सरकार आल्यावर देणार, असे आदित्य ठाकरे यांनी घोषित केले.
गेली १५ वर्षे दिपक केसरकर यांनी अगदी निष्क्रियपणे काम केले, त्यामुळे या निवडणुकीत जागरूकतेने मतदान करून राजन तेलींना निवडून आणा, असे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले म्हणाले.
सध्याच्या सरकारबद्दल जनतेमध्ये प्रचंड चिड आहे. महाराष्ट्राचे सरकार गुजरातसाठी काम करते. शिक्षण, आरोगय याची तर दुरावस्थाच झालेली आहे. विकासासाठी आलेले अडिच हजार कोटी गेले कुठे? अशा पद्धतीचा विकास होऊन चालणार नसल्याचे ईर्शाद शेख यांनी सांगितले.
ही निवडणुक म्हणजे परिक्षा पहाणारी लढत आहे. जनतेला न्याय देणारे सरकार आले पाहिजे. विरोधकांचे डिपॉझिट जप्त करून रखडलेला विकास पुन्हा करूया असे रूपेश राऊळ यांनी सांगितले.
यावेळी उमेदवार राजन तेली, शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, उपजिल्हाप्रमुख प्रकाश गडेकर, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, राष्ट्रवादीच्या नम्रता कुबल, शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, माजी सभापती जयप्रकाश चमणकर, माजी नगरसेवक प्रकाश डिचोलकर, माजी जि.प.सदस्य सुकन्या नरसुले, ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब, शहरप्रमुख अजित राऊळ, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर, सुमन निकम, अस्मिता राऊळ, ठाकरे पक्षाचे गोवा राज्य प्रमुख जितेश कामत, उपराज्यप्रमुख सुभाष केळकर , श्री.रावराणे, रितेश जाधव, लक्ष्मण आयनोडकर, युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, उपतालुकाप्रमुख उमेश नाईक आदी उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन यशवंत परब यांनी केले.