दृष्टीकोन महिला दिनाचा

         ८ मार्च हा दिवस ‘जागतिक महिला दिन‘ म्हणून साजरा केला जातो. महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचा हा दिवस. या दिवसाला अलिकडे इव्हेंटचे स्वरुप आले आहे. संस्था, मंडळांच्या माध्यमातून या दिवसाचे औचित्य साधून महिलांना व्यासपीठ मिळवून देणारे कार्यक्रम आयोजित केले जात असतात. सर्वच राजकीय पक्ष या दिवशी काहीतरी उपक्रम राबवित असतात. या बाबी निश्चितच कौतुकास्पद आहेत. तरी देखील स्त्री-पुरूष सर्वांनीच आता महिला दिन इव्हेंटच्या पलिकडे जाऊन विचार करण्याची गरज प्रकर्षाने जाणवते.

      आज स्त्रीयांनी सर्व क्षेत्र व्यापली आहेत. स्त्री तिच्या जीवनात अनेक जबाबदा­या पार पाडते. ती कुणाची मुलगी, पत्नी, बहिण या विविध नात्यांमध्ये वावरताना तिने स्वतःला नेमकं काय हवं आहे याचा विचार करायला हवा. चाकोरीबाहेरचे काम करताना तिची वाट सोपी होण्यासाठी समविचारी स्त्री-पुरुषांनी मिळून प्रयत्न करायला हवेत. स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येणा­या महिला आज सर्व प्रकारच्या कार्यक्रमासाठी हक्काच्या प्रेक्षक बनल्या आहेत. बचतगट चळवळ ही नक्कीच स्त्रीच्या कर्तृत्वाला प्रेरणा देणारे बलस्थान आहे. पण हे सर्व घडताना आपल्या समूह शक्तीचा कुणी वापर करून घेत नाही ना! हे सजगपणे तपासलं पाहिजे.

      एकीकडे स्त्रीच्या कर्तृत्वाचा आलेख उंचावत असताना महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गुंतागुंतीचा होत चालला आहे. कठोर कायदे असून देखील महिला अत्याचारांच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. या बाबतीत अलिकडच्या काही वर्षात वाढलेली प्रवृत्ती म्हणजे अशा घटनांचा निषेध व्यक्त करणे, जनमताचा दबाव कायम ठेवणे याबाबतीतही राजकीय पक्षांचे महिला नेतृत्व, कार्यकर्ते हे आपल्या पक्षाचे सरकार अडचणीत तर येणार नाही याचीच काळजी आधी घेताना दिसत आहे. पीडित महिलेची जात, धर्म बघून स्ट्रॅटेजी ठरवली जाऊ लागली आहे. फेसबुक, ट्विटर, युट्युब व्हिडीओ या समाज माध्यमातून फेक व्हिडीओ प्रसारित करणे, त्यावर अश्लील कमेंटस देणे अशा प्रकाराने पीडितेचे चारित्र्य हनन करुन तिच्या कुटुंबियांचे मानसिक खच्चीकरण करण्याचे प्रकार वाढत आहेत, अशा आक्षेपार्ह व्हिडीओची सायबर सेलकडे तक्रार केल्यानंतर व्हिडीओ डिलीट होतो. संबंधितांवर कारवाई होते. परंतु, तोपर्यंत व्हायची ती बदनामी होऊन गेलेली असते. अलिकडच्या काही दिवसातील पुण्यातील स्वारगेटसारख्या २४ तास गजबजलेल्या बस स्थानकावर बंद बसमध्ये महिला अत्याचारासारख्या घटना उघडकीला आल्या. यावरून बस स्थानकासारखी सार्वजनिक ठिकाणे देखील महिलांसाठी सुरक्षित राहिली आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो. अशावेळी सोशल मीडियावर ब­याच लोकांनी महिलांनी, मुलींनी कसे वागावे, काय करावे याचेच सल्ले द्यायला सुरूवात केली. कधीतरी आपण मुलांना शिकवणार आहोत का? मुलांनी महिलांशी आदराने कसे वागावे याची धडे देण्याची गरज प्रकर्षाने निर्माण झाली आहे. पण याकडे आपण जाणीवपूर्वक कधी लक्ष देणार आहोत?

   कुटुंबात स्त्री पुरुष समानतेच मूल्य जाणीवपूर्वक कृतीतून राबवायला हवं. सामान्यतः आपण कुटुंबात बघितलं तर, आईने घेतलेला एखादा निर्णय बाबा सहज काय मूर्खपणा हा म्हणून केरात काढतात. पण बाबांचा प्रत्येक निर्णय आईसाठी शिरसवांद्यच असतो. थोडक्यात कुटुंबातील अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार कोणाकडे आहेत हे मुलं पाहत असतात. शिकलेल्या आईला देखील या घरच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेणारी कुटुंब खूप कमी असतात. हल्ली दोघेही नोकरी करणारे असले तरी स्वयंपाकपाणी, मुलांची आजारपणे, ज्येष्ठांची काळजी ही कामे आईच उचलताना दिसते. जेव्हा एखाद्या आजारपणाने जिला शक्य होत नाही, तर बाई लावून टाक असं सहज सांगितलं जातं. यातूनही आई जी कामे करते ती कामे कुणीही बाईने करण्याची आहेत हे गृहीत धरलेलं असत. कुठल्याही सार्वजनिक क्रिया कौटुंबिक कार्यक्रमाची आखणी करताना बायका, मुलांना साध्या, सोप्या जबाबदा­या टाकून त्या कर्तृत्वहीन असतात, बालबुध्दीच्या असतात. हेच अधोरेखित केलं जातं.

      पुरूषी काम आणि बायकी कामं अशी विभागणी बघतच मोठ्या होणा­या मुलांच्या मनात मग हा दुजाभाव रूजत जातो. मुलगा म्हणून त्याचे लहानसहान हट्ट पुरवताना त्याला नकार पचवण्याची सवय लागतच नाही, मी म्हणेन ते झालं पाहिजे हा अहंकार सर्वांच्याच नकळत वाढला आणि जोपासला जातो. समाजावर ज्याचा प्रचंड पगडा आहे त्या चित्रपटांतूनही पुरूष माणजे सामर्थ्य, बल आणि स्त्री म्हणजे नाजुकता आणि सौंदर्य हेच तिचं विश्व. आता आपल्याला हव्या असलेल्या मुलीने होकार देण्यासाठी हिरोने टवाळखोरी करणे नाचणे, या बेसिक गोष्टीपासून ओढणी खेचण्यापर्यंत काहीही करताना दाखवलं जात आणि तेही बरोबर असल्याच्या थाटात कुठेतरी रूजत असतं. त्यामुळे चित्रपट हा मनोरंजनाचा बाजार आहे आणि त्यातल्या गोष्टी निव्वळ काल्पनिक असतात. ब­याचदा चुकिच्याही असतात. हे पालकांनी त्याचवेळी गप्पा मारताना मुलांपर्यंत पोहचवल पाहिजे. एखाद्या मुलाने केलेली टवाळी किवा अपमान ही सहन करण्याधी किंवा तुला लज्जास्पद वाटण्याची गोष्ट नाही हे मुलींच्या मनावर बिंबवण तितकंच महत्त्वाच आहे.

      घराघरातून दुजाभाव करणारी श्रमविभागणी बदलणे, केरवारे, पाणी भरणे, मांडी घासणे, स्वयंपाकात मदत या गोष्टीत मुली इतकीच मुलांची मदत घेणे हे एक महत्त्वाचं पाऊल ठरू शकेल. मुला-मुलींना आपल्या सहज स्वभावानुसार वागू देणे सर्वात महत्वाचे. एखाद्या हळव्या मुलाला रडताना बायकी म्हणून हिणवणे किवा मोठ्याने हसणा­या, बोलणा­या मुलीला पुरूषी हे लेबल लावणे बंद केले पाहिजे. मी बाईमाणूस काय करणार? अशी वाक्ये बायकांनी आणि बायकांना अक्कल कमीच ही वाक्य पुरूषांनी बंद केली पाहिजेत. आपल्याला प्रत्येकाला असे अनेक उपाय दिसत असतील अगदी साधे वाटणारे पण दीर्घकाळ परिणाम करणारे हे उपाय आपण सहज अंमलात आणू शकतो.

     महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणा­या सावित्रीबाई फुले, महिलांच्या बाबतीतील अनिष्ट प्रथांविरोधात कृती करणारे राजा राममोहन रॉय, गोपाळ गणेश आगरकर, धोंडो केशव कर्वे या सर्वांनीच तत्कालिन समाजाचा प्रचंड विरोध पत्करला. त्यामुळेच आज काही सकारात्मक बदल दिसत आहेत. एकूणच समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी बदलत्या आव्हानांना स्त्री-पुरुष सर्वांनीच सक्षमपणे तोंड द्यायला हवे आहे. एकमेकांशी संवाद साधायला हवा . स्त्री-पुरूष हे स्पर्धक म्हणून विचार न करता परस्परांना पूरक काम करत सहकार्याने पुढे गेले तरच एका सजग समाज म्हणून आपली ओळख राहिल.

Leave a Reply

Close Menu