राज्य परिवहन महामंडळामार्फत राज्यात एक हजार सीएनजी गाड्या देण्याचे सुतोवाच शासनाकडून करण्यात आले होते. त्यानुसार सुमारे 700 गाड्या राज्यात पुरविण्यात आल्या आहेत. त्या सुमारे 7 वर्षे वापरलेल्या व सीनजी गॅसकिट बसवून पाठविलेल्या गाड्या असल्याचे समजते. जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी व वेेंगुर्ले आगाराकडे केलेल्या चौकशीत त्या गाड्या 7 वर्षे वापरलेल्या व नवीन गॅसकिट बसविलेल्या आहेत. सदर गाड्या 7 ते 8 वर्षे व्यवस्थित चालू शकतील, असा दावा संबधितांनी केला आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यास सीएनजीच्या नवीन बसेस दिल्या, हा भुलभुलैया शासनाचे मंत्री, लोकप्रतिनीधी व राज्यपरिवहन महामंडळाचे पदाधिकारी व अधिकारी करीत आहेत. मात्र, सदर गाड्या वापरलेल्या असून अर्नाळा, ठाणे, भोपटे, कल्याण, जळगाव, मुरबाड, सिंदखेडा या डेपोच्या आहेत. या गाड्यांवर असलेली अन्य डेपोची नावे बदलण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तसेच गाड्यांमधील खराब झालेल्या सीट बदलणे व अन्य स्वरुपाची कामे हे संबंधित डेपीतील मेकनिक विभागात करून घेतली जात आहेत.
सिंधुदुर्गात सीएनजी बसेस फक्त कणकवली, कुडाळ व वेंगुर्ले डेपोसाठीच
राज्य परिवहन महामंडळाकडून सिंधुदुर्ग जिल्हा डिव्हिजनसाठी 150 सीएनजीच्या गाड्या देण्यात येणार आहेत. त्यानुसार कणकवली, कुडाळ व वेंगुर्ले या तीन आगारांना अनुक्रमे सुमारे प्रस्तावित 25-25 अशा गाड्या मिळाल्या आहेत. इतर डेपोंना या गाड्या दिल्या जाणार नाहीत. कारण, इतर डेपोकडे राज्य परिवहन महामंडळाच्या जागेत सीएनजी टाकी उभारण्यास जागा नाही. तसेच सीएनजी पुरविणारा पेट्रोलपंप चार किमी अंतराच्या आत नाही. त्यामुळे तीन डेपोतूनच सीएनजीच्या बसेस कार्यरत राहणार आहेत.
लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी डिझेल गाड्यांचाच वापर होणार
यापुढे राज्य परिवहन महामंडळ सीनजी बसेस चालविणार, अशा चर्चा होत आहेत. मात्र, ते चुकीचे असल्याचे मत महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. कारण, लांब पल्ल्याच्या गाड्या या डिझेलवरच चालणाऱ्या असतील. डिझेलच्या गाड्या या डिझेल इंधन भरण्यास थांबल्या, तरी त्याचा प्रवाशांवर परिणाम होत नाही. मात्र, ती सीएनजीची बस असली तर सीएनजी भरताना सीएनजीच्या नियमावलीप्रमाणे गाडीत कुणीही व्यक्ती असता कामा नये. त्यामुळे प्रवासी सीएनजी इंधन असलेल्या बसमधून प्रवास करताना ते इंधन रात्रीच्या वेळी संपल्यास प्रवाशांना गाडीतून खाली उतरावे लागेल आणि त्यांची रात्री अपरात्री गैरसोय होईल. त्यामुळे महामंडळाने लांब पल्ल्याच्या प्रवासी सेवा देणाऱ्या एस.टी. बसेस या डिझेल इंधनाच्याच ठेवल्या आहेत.
वेंगुर्ले आगारास लांब पल्ल्याच्या प्रवासी सेवेसाठी नवीन 7 गाड्यांची गरज
राज्य परिवहन महामंडळाच्या वेंगुर्ले आगाराने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई झोनमध्ये बाळासाहेब ठाकरे ‘स्वच्छ व सुंदर आगार व बसस्थानक’ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविले आहे. त्यास 5 लाखाचे बक्षीस सुद्धा मिळालेले आहे. त्या निधीतून बसस्थानकाच्या ठिकाणी कमिटींनी सुचविलेली कामे करून घेतली जात आहेत. मात्र, या आगारास राज्य परिवहन महामंडळाकडून नवीन डिझेलच्या 7 गाड्या लांब पल्ल्याच्या प्रवासी सेवेसाठी मागणी करूनही गेल्या 7 ते 8 वर्षात मिळालेल्या नाहीत. हे वेंगुर्लेतून लांबपल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे दुर्दैव की महामंडळाचा वेंगुर्ले आगारवर दुर्लक्ष म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
लाखो रुपये खर्चून उपहारगृहे बांधली जातात, पण..
राज्य परिवहन महामंडळामार्फत एस. टी. च्या ‘बहुजन सुखाय बहुजन हिताय’ या ब्रिदा अंतर्गत प्रवाशांच्या सेवेसाठी लाखो रुपये खर्चुन प्रत्येक बसस्थानकाच्या ठिकाणी उपहारगृहे बांधली गेली आहेत, अन बांधली जात आहेत. मात्र, बांधलेल्या उपहारगृहाचे उत्पन्न महामंडळ ठरवेल त्या रकमेप्रमाणे ठेका मिळावा, अशी महामंडळाची धारणा आहे. उपहारगृहाच्या ठिकाणी प्रवासी वर्गाची गद पाहून संबंधित ठेकेदार उपहारगृहे घेतात. पण, प्रवासीसंख्या कमी असेल तर त्यांना ते परवडत नसल्याने असंख्य बसस्थानकाची उपहारगृहे कुलुपबंद आहेत. यावर राज्य परिवहन महामंडळाने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. ती उपहारगृहे बंद ठेवून काहीच फायदा नाही. त्यापेक्षा त्या भागातीत बस स्थानकांतील प्रवासी संख्येवर उपहारगृहाचा निविदा दर कमी करण्याची गरज आहे. अशी उपहारगृहे राज्य परिवहन महामंडळाने स्वतःचे कर्मचारी नियुक्त करून त्या पद्धतीने सेवा दिली जावी. म्हणजे, प्रवाशांना त्याचा फायदा मिळेल, अन् त्या उपहारगृहापासून महामंडळास उत्पन्नसुद्धा मिळू शकेल.
उपहारगृहे असलेल्या बस स्थानकांत जेवण्याच्या वेळेत बस थांबण्याची गरज
राज्य परिवहन महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या बसेस या प्रवासात दुपारी 12.30 ते 1.30 तर रात्री 8.30 ते 9.30 या जेवण्याच्या वेळेत थांबत नाहीत. असा प्रकार प्रशासनाने चालक वाहक यांना दिलेल्या रुटनुसार बसेस चालविल्या जातात पण, जेवणाचा वेळ उलटून गेल्यानंतर खासगी ठिकाणी बस जेवणासाठी थांबविली जाते. यामुळे राज्य परिवहन महामंडळाची बरीच उपहागृहे चालत नाहीत. उपहारगृहे चालण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
– भरत सातोस्कर, वेंगुर्ले, 7588345016