कोकण म्हणजे सोन्याची अंडी देणारी भूमी असे भाजपाच्या लोकांना वाटत आहे. कोकणभूमी परप्रांतियांच्या घशात घालण्याचे काम भाजप करत आहे. आतातर ग्रामपंचायतीचे अधिकार काढून घेणार आहेत आणि त्याठिकाणी सिडको आणणार आहेत. यात वेंगुर्ला तालुक्यातीलही काही ग्रामपंचायतींचा समावेश आहे. कॅबिनेट मंत्री असून सुद्धा केसरकर यांनी या सिडकोला विरोध केला नाही. परंतु, आपण स्वतः, आमदार वैभव नाईक, राजन साळव यांनी या सिडकोला विरोध केला. कोकणभूमी ही आमची आहे, आमच्या पूर्वजांची आहे. आम्ही भूमिपूत्रांना उद्ध्वस्त करून विकास करणार नाही. नारायण राणे आणि दीपक केसरकर कोकणभूमी हडप करायला निघाले आहेत. पण आमची मशाल या कमळाला करपून टाकल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन माजी खासदार आणि लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत यांनी वेंगुर्ला येथे केले.
इंडीया आघाडीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ १ मे रोजी वेंगुर्ला-माणिकचौक येथील स्व.सी.आर. खानोलकर व्यासपिठावर जाहीर प्रचार सभा संपन्न झाली. यावेळी व्यासपिठावर माजी आमदार शंकर कांबळी, शिवसेनचे जिल्हा समन्वयक बाळा गावडे, सेनेच्या नेत्या जान्हवी सावंत, शेतकरी नेते लक्ष्मणराव वडले-पाटील, राष्ट्रवादी काँग्रसचे नेते माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, राष्ट्रवादी महिला प्रदेश उपाध्यक्षा नम्रता कुबल, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, ठाकरे सेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदार संघ संफ प्रमुख शैलेश परब, समाजवादी नेते अण्ण केसरकर, राष्ट्रवादीच्या कोकण विभागाच्या महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे अध्यक्ष रमण वायंगणकर, सेनेच जिल्हा समन्वयक बाळा गावडे, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, वेंगुर्ला तालुका संफ प्रमुख भालचंद्र चिपकर, माजी सभापती जयपकाश चमणकर, जगन्नाथ डोंगरे, सेनेचे तालुका प्रमुख यशवंत परब, उपजिल्हा प्रमुख प्रकाश गडेकर, संदेश निकम, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विधाता सावंत, ठाकरे सेनेचे वेंगुर्ला आगार एस.टी कामगार सेनचे अध्यक्ष संजय गावडे, अॅड.जी. जी. टांककर, सेनेचे तालुक युवा अधिकारी पंकज शिरसाट, सावली पाटकर आदी इंडीया आघाडीतील पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, बॅ.नाथ पैंच्या भूमित राडेबाज हा शब्द जन्मालाच येऊच शकत नाही. पण दुर्देवाने नारायण राणे यांनी त्यांच्या दोन पूत्रांनी वेंगुर्ला बदनाम केले. ३७ वर्षे सिधुदुर्गाच्या राजकारणात असलेल्या राणेंना जे जमले नाही ते या विनायक राऊतने १० वर्षात करून दाखविले. माझा राजकीय इतिहास रक्तरंजित नाही. उलट ३७ वर्षांत राणेंनी ९ राजकीय बळी घेऊनही आरोपी का पकडले गेले नाही? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. आम्ही राजकीय हत्या केल्या नाहीत, जमिनी बळकावल्या नाहीत, मी केले ते आमच्या संस्कृतीचे जतन केले. म्हणूनच माझ्या पुण्याईच्या जोरावरच आज सोन्यासारखी माणसे भेटली. आपण बॅ.नाथ पै, प्रा.मधू दंडवते यांचा आदर्श घेऊन संसदेत काम केले. ३० वर्षांच्या कारकीर्दित राणेंनी स्वतःचे रूग्णालय, इंजिनिअर कॉलेज आणले. पण आम्ही स्वतःच कॉलेज नाही काढले, आम्ही काढले शासकीय महाविद्यालय तेही एक हजार कोटी रूपयांच्या तरतूदीसहीत, किनारपट्टीच्या भागात भूमिगत वाहिन्या करण्यासाठी ३ हजार ५०० कोटींचा प्रोजेक्ट उद्धव ठाकरेंनी मंजूर केला असल्याची माहिती राऊत यांनी दिली.
दीपक केसरकर यांचाही समाचार घेतला. राणेंना मत म्हणजे दहशतवादाला मत असे म्हणणारे केसरकर आता गप्प का? केसरकर सत्तेसाठी लाचार बनले असल्याचेही सांगितले. यावेळी व्यासपिठावरील मान्यवरांनीही उपस्थितांना संबोधित केले. या सभेला बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व जनता उपस्थित होती.