वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात आंबा काजू बागायतदार संघाचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी संघाचे सचिव अॅड.प्रकाश बोवलेकर, पदाधिकारी किशोर नरसुले, शिवराम आरोलकर, सदानंद पेडणेकर, रत्नदीप धुरी, सुरेश धुरी, स्वप्निल शिरोडकर, सदाशिव आळवे व यशवंत उर्फ आबा मठकर उपस्थित होते.
सततच्या अतिउष्णतेमुळे आंबा फळांवर मोठ्या प्रमाणावर चट्टे आल्याने अशा फळांची विक्री होऊ शकली नाही. थ्रीप्स रोग व फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे सुद्धा आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. परिणामी यावर्षी केवळ ३५ ते ४० टक्केच उत्पादन आंबा उत्पादकांना मिळाले. त्यामुळे आंबा बागायतदारांना शासनाने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. यावर्षी आंबा बागायतदारांना फळमाशीचा त्रास मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागला. प्रादेशिक फळ संशोधन केंद्राने सूचविलेल्या रक्षक सापळ्यांनाही आता ही फळमाशी दाद देत नाही. फळमाशी फळांना डंख करून ते फळ प्रदूषित करते. फळमाशीने डंख केलेले फळ डागाळत असल्याने ते विक्रीसाठी योग्य नसते. प्रादेशिक फळ संशोधन केंद्रांने यावर कायमस्वरूपी उपाय शोधावा, अशी मागणी बागायतदारांनी केली.
शेकरूसोबत वेंगुर्ला परिसरात आता लाल तोंडाची माकडे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. दोन्ही प्राणी नारळ व काजू पिकांचे अतोनात नुकसान करत आहेत. मोठ्या मेहनतीने तयार केलेले उत्पादन निसर्गाच्या लहरीपणाबरोबरच आता जंगली प्राण्यांमुळेही धोक्यात आले आहे. याकडे शासनाने आता तरी गांभीर्याने पहावे. अन्यथा, आतापर्यंत शांत असलेल्या शेतक-याकडून संतापाच्या भरात या वन्य प्राण्यांवर हल्ला होण्याची शक्यता आहे. कोकणातील शेतकरी संयमी आहे, निसर्गाची कदर करणारा आहे. वन्य प्राण्यांना कोणताही त्रास होईल असे कृत्य तो करत नाही. त्यामुळे शासनाने मोठ्या प्रमाणात वाढलेल्या वन्य प्राण्यांचे योग्य ते व्यवस्थापन करून शेतकयांच्या पिकांची काळजी घ्यायला हवी, अशी मागणी आबा मठकर यांनी या बैठकीत केली
सदाशिव आळवे यांनी येथील फळ संशोधन केंद्राकडून शेतकयांच्या भल्यासाठी होत असलेल्या संशोधनावर आक्षेप घेत प्रशासनाच्या मंद कारभारावर ताशेरे ओढले. आधीच अडचणीत असलेल्या बागायतदारांना आता बोगस खते व किटकनाशकांचाही आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यावर अंकुश कोण ठेवणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. किशोर नरसुले, सदानंद पेडणेकर, शिवराम आरोलकर, स्वप्निल शिरोडकर यांनीही चर्चेत सहभाग घेऊन बोगस कंपनींचा शोध घेऊन शासनाने बागायतदारांचे शोषण रोखावे, अशी मागणी केली.
वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे रोग शास्त्रज्ज्ञ डॉ. यशवंत गोवकर व कनिष्ठ किटक शास्त्रज्ज्ञ डॉ. वैशाली झोटे यांनी फळमाशी व अन्य रोगांच्या नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले. रक्षक सापळा परिसरातील सर्व बागांमध्ये लावला गेला तरच फळमाशीवर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. सर्व बागायतदारांनी रक्षक सापळ्याचा उपयोग करावा, रोटा व अन्य कीड रोगांच्या नियंत्रणासाठी प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात असलेली औषधे परिणामकारक आहेत. बागायतदारांनी आमच्याशी संफ साधून आपल्या बागा रोगमुक्त कराव्यात, असे आवाहन डॉ. गोवेकर यांनी बैठकीत केले.
पुढील बैठकीस कृषी विभागाचे सर्व अधिकारी, जिल्हाधिकारी यांना निमंत्रित करून बागायतदारांना भेडसावणा-या विविध समस्यांबाबत चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांनी दिले. शिवराम आरोलकर यांनी आभार मानले.
दरम्यान, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वेंगुर्ला शाखेच्या स्नेहल गावडे यांनी बैठकीस उपस्थित राहून लोकमान्य सोसायटीतर्फे शेतकरी, बागायतदारांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. त्यांच्या सोबत सौ. करंगुटकर व प्रकाश मालवणकर उपस्थित होते.