मुलांनी शांत डोक्याने विचार करून आपल्या करियरच्या दिशा ठरवाव्यात. त्यानुसारच पुढील शिक्षणाचे पर्याय निवडावेत. तुम्ही आमच्या भावी भारताचे आधारस्तंभ आहात. त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाचा पायासुद्धा भक्कमच असायला हवा. स्वतःला सिद्ध करण्यासाठी उच्च शिक्षणाशिवाय आता तरणोपाय नाही. दहावी, बारावीच्या परीक्षेत मिळविलेली गुणवत्ता पुढील शिक्षणासाठी आवश्यक पात्रता परीक्षांमध्येही दिसली पाहिजे, यासाठी स्वतःला आतापासूनच तयार करा, गुणवंत व्हा, खुप मोठे व्हा आणि आम्हाला तुमच्यामुळे अभिमान वाटेल असे क्षण निर्माण करा, असे आवाहन अर्चना घारे परब यांनी केले आहे.
वेंगुर्ला येथील साई डिलक्स हॉलमध्ये अर्चना घारे फाऊंडेशन व वेंगुर्ला तालुका शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा नम्रता कुबल, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष योगेश कुबल, उपाध्यक्ष विशाल बागायतकर, परेश सारंग, कृषी सेलचे अध्यक्ष बाबा टेमकर, वेंगुर्ला शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, शहर कार्याध्यक्ष सुहास कोळसुलकर, तालुका सचिव स्वप्निल राऊळ, तुळस विभागीय अध्यक्ष अवधूत मराठे, तुळस विभागीय महिला अध्यक्षा सौ. चुडनाईक, तालुका पदाधिकारी बबन पडवळ, नितेश कुडतरकर आदी उपस्थित होते.
वेंगुर्ला तालुक्यातील १९ विद्यालयामधील दहावीच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, बारावीच्या परीक्षेत तालुक्यातील चार कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान, वाणिज्य, कला व किमान कौशल्य शाखेतून प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेले झालेले विद्यार्थी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रज्ञाशोध व विविध टॅलेंट सर्च परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणारा तिसरीतील विद्यार्थी रियान संदीप कोळसुलकर याचाही यावेळी गौरव करण्यात आला.
शिक्षण क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. प्रचलित अभ्यासक्रमांपेक्षा ज्याची डिमांड जास्त आहे असे शिक्षण घेण्याचा प्रयत्न करा, असे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले म्हणाले. राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनीही मुलांना पुढील शिक्षणाच्या दीशा ठरविण्यासाठी उपयुक्त असे मार्गदर्शन केले. राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणी पदाधिकारी नम्रता कुबल, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष योगेश कुबल यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यवान साटेलकर व बबन पडवळ यांनी केले. प्रास्ताविक योगेश कुबल यांनी केले तर आभार सचिव स्वप्निल राऊळ यांनी मानले.