आजगांव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या सलग ५० व्या मासिक कार्यक्रमाचे औचित्य साधून शिरोडा येथील खटखटे ग्रंथालयाच्या सहयोगाने प्रेरणा साहित्य संमेलन ग्रंथालयात आयोजित केले होते. उद्घाटन गोव्यातील लोककलेच्या व लोकसाहित्याच्या अभ्यासक तथा नामवंत साहित्यिक प्रा.पौर्णिमा केरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी खटखटे ग्रंथालयाचे अध्यक्ष राजन शिरोडकर, कार्याध्यक्ष रघुवीर तथा भाई मंत्री, कार्यवाह सचिन गावडे, सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश म्हस्के, साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक तथा नामवंत कवी विनय सौदागर, सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालयाचे मुख्याधिकारी सचिन हजारे व मांद्रे (गोवा) येथील ‘साहित्य संगम‘ चे कार्यवाह प्रा.गजानन मांद्रेकर आदी उपस्थित होते.
साहित्य समाजमनाला उन्नत करते. जगणं संयत करते आणि निराशलेल्या मनात प्रेरणेची ज्योत प्रज्वलित करते. अनुभवातून आलेली अस्वस्थता घेऊन साहित्यिक लिहीत असतो. त्यामुळे साहित्य वाचकाच्या जीवनाला अनुभवसंपन्न बनवते, असे प्रतिपादन प्रा.पौर्णिमा केरकर यांनी केले. संमेलनाच्या पहिल्या सत्रात वाचनवृद्धीसाठी ‘मी केलेले प्रयोग‘ या विषयावर कोकणातील दशावतार कलेचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा.विजय फातर्पेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिसंवादात कोकण मराठी साहित्य परिषदेचे मालवण शाखाध्यक्ष सुरेश ठाकूर व म्हापसा, गोवा येथील श्री गणेश उच्च माध्यमिक विद्यालयाचे निवृत्त प्राचार्य गजानन मांद्रेकर यांनी शिक्षक तथा विद्यार्थ्यांमध्ये वाचनवृद्धी व्हावी यासाठी केलेल्या नावीन्यपूर्ण प्रयोगांची माहिती दिली.
विनय सौदागर यांच्या ‘मुबाई‘ या कवितासंग्रहाचे प्रकाशन यावेळी शिरोड्याच्या सरपंच लतिका रेडकर यांच्या उपस्थितीत निवृत्त शासकीय अधिकारी सतीश लळीत यांच्या हस्ते, तर कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानने सुप्रसिद्ध साहित्यिक कै.जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने काढलेल्या ‘कनक रंगवाचा‘ विशेषांकाचे प्रकाशनही पौर्णिमा केरकर यांच्या हस्ते झाले.
सुप्रसिद्ध कवी डॉ.सुधाकर ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनात स्नेहा नारिगणेकर, सोमा गावडे, मिहीर नाईक, भालचंद्र दीक्षित, नीलम कांबळे, संकेत येरागी, सदानंद बांदेकर, आसावरी भिडे, सुभाष शेटगावकर, पुरुषोत्तम कदम, विठ्ठल कदम व विनय सौदागर यांनी कविता सादर केल्या.
आरवली येथे जन्मलेले सुप्रसिद्ध साहित्यिक कै.जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने ठेवलेल्या ‘स्मरण जयवंत दळवींचे‘ या विशेष कार्यक्रमात जयवंत दळवी यांची पुतणी शुभा दळवी-कुलकर्णी यांनी ‘आमचे जयाकाका‘ या विषयावर बोलताना दळवी यांचे कौटुंबिक रूप चित्रित केले. गोव्यातील नामवंत लेखिका सोनाली परब-सावळ यांनी दळवी यांची ‘वाट ही सरे ना‘ या कथेचे भावपूर्ण वाचन केले.
साहित्य प्रेरणा कट्टा व खटखटे ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने दर आठवड्याला जयवंत दळवींच्या पुस्तकांवर होणाया चर्चेसंदर्भात सचिन गावडे यांनी माहिती दिली. वामन पंडित यांनीही दळवी यांच्या काही आठवणी सांगितल्या.
जयवंत दळवी आरवली येथील ज्या शाळेत शिकले त्या जीवनशिक्षण शाळेच्या व आजगांव येथील गोगटे गुरूजी प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या लेखन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. गोव्यातील नाट्यलेखक पांडुरंग गावडे यांच्या ‘सखी जन्मांतरीची‘ या नाटकाचे पुस्तक उपस्थित यांना भेट देण्यात आली.
समारोपाच्या सत्रात मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून घेण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व संबंधितांचे व महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन करणारा व कै.जयवंत दळवी यांचे आरवली-शिरोडा परिसरात कायम स्वरूपी स्मारक व्हावे अशी महाराष्ट्र शासनाकडे मागणी करणारा ठराव अनुक्रमे सोमा गावडे व शेखर पणशीकर यांनी मांडला, तर वाचनवृद्धीसाठी प्रयत्नशील रहाण्याचा संकल्प करण्याचा ठराव संध्या आरोलकर यांनी मांडला. तिन्ही ठराव सर्वानुमते पारित करण्यात आले. मोकळ्या वेळेत आत्माराम बागलकर यांनी ‘रायगडाला जाग येते‘ या नाटकातील प्रवेश सादर केला. तेजल गावडे या विद्यार्थिनीने जुन्या मराठी कविता सादर केल्या तर, नामवंत गायक युसूफ आवटी यांनी जुनी मराठी गाणी सादर केली.
ज्येष्ठ पत्रकार अनिल निखार्गे, सरोज रेडकर, स्नेहा नारिगणेकर, सुभाष शेटगावकर, अर्चना लोखंडे यांनी विविध सत्रांत ऋणनिर्देश केला. संमेलन यशस्वीतेसाठी परिश्रम घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांना पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन सचिन दळवी यांनी केले. विनय सौदागर यांनी आभार मानले.