परुळे-चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर लवकरच अलायन्स एअर सेवा पुन्हा सुरू होणार आहे. नागरी विमान वाहतूकमंत्री के. राममोहन नायडू यांनी याबाबत विशेष योजना अंमलात आणण्यात येईल, असे माजी केंद्रीयमंत्री खासदार नारायण राणे यांना आश्वासन दिले आहे. अलायन्स एअर सेवेबाबत खासदार राणे यांनी नागरी विमान वाहतूकमंत्री नायडू तसेच राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेत सिंधुदुर्ग विमानतळावरील सेवा-सुविधांकडे लक्ष वेधले.
गेले काही महिने चिपी विमानतळ ते मुंबई ही नियमित सुरू असलेली सेवा बंद झाली आहे. ही सेवा पुन्हा मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई अशी सुरू करण्यासाठी उड्डाण संचालनालयाने विशेष धोरण अंमलात आणावे, यासाठी राणे आग्रही आहेत. या पार्श्वभूमीवर राणे यांनी ही भेट घेतली.
सिंधुदुर्ग जिल्हा हा समुद्र किनारे, विपुल नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक, धार्मिक स्थळे आणि खाद्य पदार्थांसह पर्यटकांचे देशव्यापी तसेच आंतरराष्ट्रीय आवडते ठिकाण आहे. केंद्र सरकारने या पार्श्वभूमीवर प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजना किंवा उडानमध्ये समाविष्ट करण्यासाठी सिंधुदुर्ग विमानतळाची निवड केली. अलायन्स एअरने मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई दरम्यान उड्डाणे सुरू केली. आरसीएसचा कालावधी तीन वर्षांचा होता, जो ऑक्टोबर 2024 मध्ये संपला. उड्डाण सेवा थांबविल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेवर तसेच एअरलाईन वापरकर्त्यांवर विपरित परिणाम झाला आहे. मुंबई ते चिपी सेवा कार्यान्वित असताना पर्यटकांना, जिल्हावासीयांना मोठा लाभ होत होता. सणासुदीच्या काळात, हवाई मेळा 25,000 रुपयांपर्यंत वाढायचा. एका मार्गासाठी कधी-कधी अप्रत्याशिततेचा एअरलाईन वापरकर्त्यांवर परिणाम झाला. परंतु फ्लाईट नेहमीच बूक केल्या गेल्या. पर्यटक, स्थानिक प्रवासी आणि जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला मिळणारी उभारी लक्षात घेता, सिंधुदुर्गासाठी आरसीएस आणखी पाच वर्षांसाठी वाढवावी. सिंधुदुर्गसाठी अलायन्स एअर सेवा पुन्हा सुरू करावी, अशी भूमिका राणे यांनी स्पष्ट केली. लवकरच ही सेवा सुरु करण्याबाबत केंद्रीय मंत्र्यांनी आश्वासन दिले.