भगवंत आणि गुरूतत्त्वाचा आशीर्वाद धर्माच्या रक्षणासाठी कार्यरत असणायांवरच असतो, हेच इतिहास सांगतो. आज ही गुरुतत्त्व सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि भारताच्या उत्कर्षासाठी कार्यरत आहे. त्यामुळे प्रत्येकाने राष्ट्र आणि धर्माच्या कार्यासाठी झोकून देणे आवश्यक असून राष्ट्र आणि धर्म कार्यात सहभागी होणे हीच खरी गुरूपौर्णिमेला गुरूंसाठी गुरुदक्षिणा ठरेल असे आवाहन विष्णू कदम यांनी केले.
सनातन संस्थेच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहा ठिकाणी ‘गुरूपौर्णिमा महोत्सव‘ संपन्न झाला. आरवली येथील साळगावकर मंगल कार्यालय येथे गुरुपौर्णिमा महोत्सव घेण्यात आला. प्रारंभ श्री व्यासपूजन आणि प. पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमापूजनाने झाला. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन केले गेले. ‘सनातन राष्ट्र शंखनाद‘ यावर प्ररणादायी व्हिडिओ प्रक्षेपण करण्यात आले. तसेच रामराज्य स्थापनेसाठी संकल्प व सामूहिक नामजपयज्ञ करण्यात आला. विष्णू कदम म्हणाले की, आतापर्यंतच्या दंगलींचा इतिहासही हेच सांगतो की, जेथे जेथे धर्मांध माजले, तेथे त्यांनी हिंदूंना, हिदूंच्या श्रद्धास्थानांना लक्ष्य केले आहे. आज आपण युद्धसदृश अवस्थेत आहोत. हे फक्त सीमांवरील लढाईसारखे वाटत असले, तरी खरे युद्ध हे धर्मयुद्धच असल्याचे सांगितले. यावेळी आजगाव येथील सरिता प्रभू यांनी आपली साधना आणि अनुभूती सांगितल्या. कार्यक्रमस्थळी धर्म, अध्यात्म, साधना, आचारधर्म, आयुर्वेद, प्रथमोपचार, बालसंस्कार, स्वसंरक्षण, हिदूराष्ट्र आदी विषयांवरील ग्रंथप्रदर्शन आणि फलक प्रदर्शन लावण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार शरद राऊळ यांनी मानले. महोत्सवाला मोठ्या संख्येने साधक उपस्थित होते.