वेंगुर्ला तालुक्यामधील समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासवाच्या विणीचा हंगाम चालू झाला आहे. आजपर्यंत किनारपट्टीवर तब्बल ७४ घरटी संरक्षित करण्यात आली आहेत. त्यातील वायंगणी-साळगावकरवाडी येथील प्रकाश साळगावकर यांनी १२ डिसेंबर रोजी ह्या हंगामातील पहिले समुद्री कासव ऑलिव्ह रिडले कासवाच्या अंड्यांचे घरटे संरक्षीत केले होते. त्यातून २ फेब्रुवारी रोजी ८७ पिल्ले घरट्यातून बाहेर आली. ती पिल्ले वनक्षेत्रपाल, कुडाळ अमृत शिंदे यांच्या उपस्थितीत सुरक्षित समुद्राच्या पाण्यात सोडण्यात आली. त्यावेळी प्रकाश साळगावकर, वायंगणी उपसरपंच हर्षद साळगावकर, मठ वनपाल सावळा कांबळे, मठ वनरक्षक सुर्यकांत सावंत, मठ वनसेवक शंकर पाडावे, प्रकल्प समन्वयक अमित रोकडे आणि दिगंबर तोरस्कर उपस्थित होते. यावर्षी सावंतवाडी वन विभाग मार्फत उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गातील समुद्र किनारी समुद्री कासवांच्या घरट्यांचे संरक्षण करण्याचे काम चालू आहे.