जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी जिल्ह्यातील शेती व्यवसायात वेगवेगळे केलेले प्रयोग शेतक-यांच्या बांधावर जाऊन त्यांची माहिती घेण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्यांचा हा ‘आम्ही शेतक-यांच्या बांधावर‘ उपक्रम पुढील महिनाभर सुरू राहणार असून याची सुरुवात वेतोरे गावातून करण्यात आली. मनिष दळवी यांनी वेतोरा सोसायटी चेअरमन दत्ताराम नाईक यांच्या सुमारे १० एकर क्षेत्रात लागवड केलेल्या ७०० काजू व ३०० आंबा कलम बागेला, बाबा वराडकर यांच्या जुन्या व नवीन आंबा, काजू, भोपळा पीक लागवड क्षेत्राला, तसेच दीपक वराडकर व इतर शेतकयांच्या सामायिक नाचणी, विविध भाज्या, नारळ, सुपारी बागेला भेट देत माहिती घेतली. यानंतर गोगटे यांच्या गायी, म्हैस प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली.
यावेळी पालकरवाडी सरपंच बंड्या पाटील, जिल्हा बँक जनरल मॅनेजर प्रमोद गावडे, प्रगतशील शेतकरी संतोष गाडगीळ, बाबा वराडकर, विजय पुंडलिक नाईक, उत्तम वालावलकर, प्रदीप नाईक, दीपक वराडकर, दिवाकर गोगटे, शैलेश जामदार यांच्यासहीत इतर शेतकरी व बँक कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा बँकेच्या माध्यमातून दूध व्यवसाय भरारी घेत आहे. त्याचप्रमाणे जर कुक्कुटपालन व शेळीपालन यासाठी जिल्हा बँकेने अधिक प्रयत्न केले तर त्याचा जास्त फायदा शेतक-यना होईल वर यासाठी बाजारपेठ शोधावी लागणार नाही असे मत प्रगतशील शेतकरी संतोष गाडगीळ यांनी व्यक्त केले.