वेंगुर्ला नगरपरिषद, वनशक्ती, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, बॅ.खर्डेकर महाविद्यालय,कांदळवन कक्ष मालवण व महाराष्ट्र वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पाणथळ भूमी दिनानिमित्त ‘आपल्या समृद्ध भविष्यासाठी पाणथळ प्रदेशाचे सरंक्षण करणे‘ यावर २ व ३ फेब्रुवारी कालावधीत दोन दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. उद्घाटन मुख्याधिकारी परितोष कंकाळ व प्राचार्य एम.बी.चौगले यांच्या हस्ते जलकलश पूजनाने झाले. यानंतर सर्व सहभाग सदस्यांनी जल शपथ घेतली. यावेळी भूगर्भशास्त्रज्ज्ञ डॉ.अनिलराज जगदळे, पाणथळ जागा तज्ज्ञ डॉ.नागेश दप्तरदार, सर्वात तरूण पाणथळ संशोधक, पक्षी तज्ज्ञ प्रवीण सावंत, वनस्पतीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.धनश्री पाटील, करिष्मा मोहिते, कार्यशाळेतील सहभागी नागरिक, उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे, वेतोरे हायस्कूल, बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पाणथळ क्षेत्रे ही जैवविविधतेसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. ही परिसंस्था जलसंधारण, हवामान संतुलन व जैवविविधतेच्या संवर्धनासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे त्यांचे संरक्षण करणे आपली जबाबदारी आहे. जैवविविधतेचा अभ्यास करून ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. अशा कार्यशाळा नागरिकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक दृष्टिकोन निर्माण करण्यास मदत करतात. नगरपरिषद भविष्यातही अशा प्रकारच्या उपक्रमांना पाठिंबा देत राहील व पाणथळ क्षेत्रांचे संवर्धन करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले.
कार्यशाळेत सहभागी सदस्यांनी आंबेखण पाणथळ भूमीला भेट देऊन तेथील जैवविविधतेचा अभ्यास केला. या भागात आढळणाया पक्ष्यांमध्ये जांभळा बगळा, खंड्या, टिटवी, वेडा राघू, ढोकरी, बगळा, पाकोळी, स्विफ्टलेट आणि मोठा पाणकावळा यांचे निरीक्षण करण्यात आले. क्षेत्रभेटी अंतर्गत निशाण तलाव, पाट तलाव, वालावल पाणथळ भूमी आणि धामापूर पाणथळ भूमी यांना भेटदेऊन तेथील जैवविविधतेचा अभ्यास करण्यात आला. पाणथळ क्षेत्रांना प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. त्यानंतर विविध पर्यावरणीय खेळ घेण्यात आले. यात चमचा-पाणी शर्यत या खेळाच्या माध्यमातून पाण्याची बचत आणि काटकसरीने वापर का महत्त्वाचा आहे, हे शिकवण्यात आले. तसेच, ‘‘अरे अरे ससाणा पक्षी‘‘ या खेळाद्वारे अन्नसाखळीचे संतुलन टिकवणे का गरजेचे आहे, हे मुलांना समजावण्यात आले.
पाणथळ जागा जैवविविधतेसाठी आवश्यक आहेत आणि त्यांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी स्थानिक पातळीवर या संवर्धन चळवळीचा भाग बनण्याचा निर्धार केला आणि भविष्यात पाणथळ क्षेत्रांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली.