महाराष्ट्रातील गोंदिया येथून वेंगुर्ला तालुक्यातील आडेली येथे ठेकेदार महेंद्र ठाकूर यांच्याकडे १४ सेंटरींग कामगार कामासाठी आले होते. कोव्हीड १९ लॉकडाऊनच्या काळात अडकलेले कामगार अखेर २ महिन्यानंतर १७ मे रोजी आपल्या गावी रवाना झाले.
महाराष्ट्रमध्ये आंतरजिल्हा प्रवासासाठी शासनाचा मोठा गोंधळ उडालेला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचा ताळमेळ नसल्यामुळे हाताच्या पोटावर काम करणारे विस्थापित मजूर आणि ठेकेदारांना मात्र मोठ्या प्रमाणात रक्कम मोजून कामगारांना आपल्या मूळगावी पाठविण्यात आले. केंद्र सरकारचे लॉकडाऊनचे नियम आणि राज्य सरकारचा अनोखा कारभार याचा मात्र बराच मोठा फटका ठेकेदार आणि कामगारांना बसला. शासनाच्या कोव्हीड १९च्या वेबसाईटनुसार फॉर्म भरुन शासकीय वाहनांची पूर्तता करण्यास शासन असमर्थ ठरले. रोख रक्कम एस.टी.बस साठी मागणी केली असता त्यांनीही आंतरजिल्हा सिंधुदुर्ग ते गोंदिया जाण्यास गाडी नाही म्हणून सांगितले. त्यावर पर्याय म्हणून ठेकेदार महेंद्र ठाकूर यांनी खाजगी वाहनाची व्यवस्था करुन मोठी रक्कम भरुन १७ मेच्या संध्याकाळी कामगारांना आपल्या मूळ गावी रवाना केले.