वेंगुर्ला येथे पर्यटनासाठी जेटीचे बांधकाम करणे तसेच तत्सम सुविधा निर्माण करण्याच्या कामासाठी शासनाने ४३.१० कोटी एवढ्या अंदाजपत्राकास ‘सागरमाला‘ प्रकल्पांतर्गत मान्यता दिली आहे. जिल्ह्यातील वेंगुर्ला, मालवण, देवबाग, तारकर्ली या पर्यटन ठिकाणी १० ते १५ लाख पर्यटक दरवर्षी भेटी देत असतात. महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत वेंगुर्ला बंदर येथे पाईल जेटी व त्या अनुषंगाने पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यातून जिल्ह्यातील पर्यटन वाढीला मदत होण्यासोबतच स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. वेंगुर्ला बंदर येथे १९६३ मध्ये बांधण्यात आलेली पाईल जेटी अस्तित्वात आहे.