मळगांव-जाधववाडी येथील मिलिद जाधव व अमोल मळगांवकर या दोघांनी आपला वाढदिवस साजरा करुन ते कुणालाही न सांगता आडेली धरणावर पोहायला आलेले असताना दोघांचाही धरणात बुडून मृत्यू झाला. या दोघांचे मृतदेह आज गुरुवारी दुपारी उशिरा पाण्यावर तरंगताना आढळले. या दोन्ही मृतदेहांचा पोलिस पंचनामा व शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या संदर्भात मिलिद जाधव याचा चुलत भाऊ राजन जाधव यांनी दिलेल्या खबरीनुसार वेंगुर्ला पोलिसात अकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे.
मळगांव-जाधववाडी येथील मिलिद मधुकर जाधव (२७) व अमोल गौतम मळगांवकर (२७) या दोघांचे बुधवारी वाढदिवस होते. हे वाढदिवस त्यांनी मित्रांसोबत साजरे केले. त्यानंतर ५ वाजण्याच्या सुमारास ते दोघेही मोटारसायकलने निघून गेले. मात्र, रात्रौ १० वाजेपर्यंत ते न आल्याने त्या कुटुंबातील व शेजारी आणि वाड्यातील लोकांनी सर्वत्र शोधाशोध रात्रौ उशिरापर्यंत केली. कदाचित ते आडेली धरणावर पोहण्यास जाण्याची शक्यता एका व्यक्तीने वर्तविली. त्याचा अंदाज घेत सकाळी दोन ग्रामस्थ आडेली धरणाच्या ठिकाणी आले असता त्यांना त्याची हिरोहोंडा मोटारसायकल नं. एमएच-०७-एएल-४५६१ ही धरणाच्या कठड्यावर आढळून आली. त्यानुसार शोध घेता घेता झाड्यांच्या ठिकाणी त्यांचे कपडे, मोबाईल, पैशाचे पाकीट, चप्पल आदी वस्तू दिसून आल्या. त्यानुसार त्यांनी गावात कळविले व गावातील नातेवाईकांसह ग्रामस्थ घटनास्थळी पोहचले.
या संदर्भात स्थानिक ग्रामस्थ संतोष पेडणेकर यांनी पोलिसांना कळविल्यानुसार पोलिस निरीक्षक तानाजी मोरे, पो.कॉ.डि.बी.पालकर, सचिन सावंत, प्रमोद काळसेकर, सुरज रेडकर, नितीन चोडणकर, सूर्याजी नाईक, सुरेश पाटील यांनी तसेच वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी घटनास्थळी भेट दिली. त्याचप्रमाणे आडेली सरपंच सौ. समिधा कुडाळकर, आरोग्यसेवक शेखर कांबळी, पोलिस पाटील संजना होडावडेकर, मळगांवकर पोलिस पाटील रोशनी जाधव, मळगांव सरपंच कृष्णा गावडे, मळगांव शाखाप्रमुख महेश डिचोलकर, सावंतवाडीचे माजी पं.स.सदस्य राजू परब, रुपेश राऊळ, नितीन मांजरेकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास अमोल मळगांवकर व मिलिद जाधव यांचे मृतदेह धरणातील पाण्यात तरंगू लागले. ते वा-याने किनारी येताच ग्रामस्थांच्या सहकार्याने पोलिसांनी वर घेत पोलिस पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.
दरम्यान, पोलिस यंत्रणेने बुडालेल्या व्यक्तींना काढण्यासाठी मालवण येथील रेस्क्यू पथक व वेंगुर्ल्यातील सागरी दल सदस्यांकडे संफ साधला होता. त्यानुसार ते आलेले असताना त्यावेळी मृतदेह पाण्यातून वर आल्याने त्यांना शोधाशोध करण्याची गरज भासली नाही.