वेंगुर्ला तालुक्याचा जलजीवन मिशन कार्यक्रम व कोरोना आढावा बैठक ७ मे रोजी सायंकाळी येथील पंचायत समितीच्या सभागृहात जिल्हापरिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी बांधकाम समिती सभापती चव्हाण, समाज कल्याण समिती सभापती अंकुश जाधव, जिल्हापरिषद ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी श्रीपाद पाताडे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अभियंता प्रफुल्लकुमार शिदे, पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी, गटविकास अधिकारी उमा पाटील, जिल्हा परिषद सदस्य दादा कुबल आदी उपस्थित होते. तर या आढावा बैठकीत तालुक्यात सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामसेवक यांनी ऑनलाईन सहभाग घेतला.
जलजीवन मिशन कार्यक्रमात वेंगुर्ला तालुका मागे राहिला असून तालुक्यातील सर्व सरपंच व ग्रामसेवक यांनी आपापल्या भागातील कामांचे परिपूर्ण प्रस्ताव येत्या दहा दिवसात द्यावेत असे आवाहन जिल्हपरिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी वेंगुर्ला येथे केले.
यापूर्वीच्या पाणी पुरवठाच्या विविध योजनांमधून वेंगुर्ला तालुक्यातील ५०८७ म्हणजे ३४ टक्केच कुटुंबाना पाणीपुरवठा करण्यात आला. उर्वरीत सर्वच कुटुंबाना आता जलजिवन मिशनमधून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये कुटुंबाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले असून कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला नियमित ५५ लिटर शुध्द पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यात शाळा, संस्था यांचाही समावेश आहे. पाण्याची पुढील १५ वर्षाची गरज ओळखून हा कार्यक्रम हाती घेण्यात आला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मातोंड, पालकरवाडी, पेंडूर, तुळस, वजराट, वेतोरे, आसोली, दाभोली, कुशेवाडा, मठ, रेडी, वायंगणी ग्रामपंचायतीच्या सरपंच ग्रामसेवकांशी त्यांनी यावेळी ऑनलाईन चर्चा केली. तर जमिनीचे बक्षिस पत्र किवा इतर काही समस्या असल्यास त्यांनी स्थानिक पातळीवर समन्वयाने सोडवाव्यात. तसेच गट विकास अधिकारी उमा पाटील यांनी यासंदर्भात तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्रामसेवक याची एकत्रित बैठक न घेता चार चार ग्रामसेवक सरपंच यांना निमंत्रीत करुन परिपूर्ण प्रस्ताव पाठविण्यासंदर्भात काही समस्या असल्यास त्या सोडवाव्यात असे सांगितले.
यावेळी अध्यक्ष सावंत यांनी येथील आरोग्य विभागाकडून तालुक्यातील कोरोना स्थितीची अद्ययावत माहिती घेतली.