‘या जन्मावर प्रेम करावे’ यातून पाडगांवकरांच्या साहित्याला उजाळा

सृष्टीच्या अणूरेणूतून सृजनाचा सोहळा पहाणारे कवी मंगेश पाडगावकर यांच्या कवितांवर ‘या जन्मावर प्रेम करावे‘ हा काव्य वाचन व गायन असा कार्यक्रम आनंदयात्री वाङ्मय मंडळाच्या आयोजनाखाली उभादांडा येथील अविनाश चमणकर यांच्या रिसॉर्टवर घेण्यात आला. यात ‘कोलाहलात साऱ्या‘ ही गझल अध्यक्ष अजित राऊळ यांनी, जीवंत असूनही जगता का आले नाही हे सांगणारी गझल दिव्या आजगावकर हिने, अन्याय सहन करतानाही इथली माणसे चिडत का नाहीत हे विचारणारी गझल मेघस्वी भगत हिने, तर मुखवट्यांच्या या जगात आवाज दिला तरी साद आली नाही, इथे मनातल खरं गाणं कोणीच गात नाहीत अस सांगणारी गझल आपल्या खास ढंगात स्वप्निल वेंगुर्लेकरने सादर केली. खरं जीवन हे कोणाकोणाला जगता येत हे सांगणारी गझल स्मिता नाबर यांनी, आजीचे वर्णन करताना जीवनाचे मर्म सांगणारी ‘संशय‘ ही कविता प्राजक्ता करंगुटकर यांनी, बाजारातील गर्दीत कविला आलेला एक भावस्पर्शी अनुभव सांगणारी मोकळ कविता डॉ. पूजा कर्पे यांनी, काळा रंग व उपेक्षित असलेल्या आत्म्याच्या मांडीवर लहानपणी बसलेले होते. या आठवणीने कवीला आपण विठ्ठलाच्या मांडीवर बसलो होतो याचा साक्षात्कार होतो ही कथनात्मक कविता देवयानी आजगांवकर यांनी प्रभावी रितीने सादर केली. स्वतःतून वेगळे होता येते तेव्हाच कवितेची निर्मिती होऊ शकते हे अधोरेखित करणारी ‘आकाश‘ ही कविता माधवी मातोंडकर यांनी, विनोदी बालकविता साभिनय प्रितम ओगले यांनी सादर केली. सामाजिक विसंगतीवर भाष्य करणारी ‘अहो जग पुढे गेले?‘ ही कविता पांडुरंग सामंत यांनी, ‘आनंदयात्री‘ ही कविता रश्‍मी भगत हिने तर ‘वेंगुर्ल्याचा पाऊस‘ ही कविता आपल्या खास अभिनय शैलीत सादर करून योगीश कुलकर्णी यांनी रसिकांची दाद मिळवली.

      राजकारणावर भाष्य करणारी ‘पॉलीटिक्स‘ ही कविता संजय घाडी यांनी, ‘यात काही पाप नाही‘ ही कविता जान्हवी कांबळी यांनी, ‘मी कुठे म्हणालो परी मिळावी‘ ही कविता सुनिधी मराठे हिने, ‘नजर जराशी आवर गं‘ ही कविता सुरेखा देशपांडे यांनी तर पी.के.कुबल यांनी पाडगावकरांवर स्वरचित कविता सादर केली. कवी सुधाकर ठाकूर यांनी पाडगावकरांच्या कवितांची वैशिष्ट्ये व पाडगावकरांचे सृजनशील कवींशी असलेले नाते तसेच पाडगावकरांनी आम्हा कवींना काय दिले हे सांगणारे पाडगावकरांना लिहिलेले अनावृत्त पत्र वाचून उपस्थितांची दाद मिळवली.

      कीर्तनकार ह.भ.प. अवधूत नाईक यांनी ‘भेट तुझी माझी स्मरते‘ हे भावगीत, ज्ञानेश करंगुटकर यांनी अभिषेकी गीत ‘माझे जीवन गाणे‘ सादर केले. वासुदेव पेडणेकर यांनी ‘शब्दावाचुनी कळले सारे शब्दांपलिकडले‘ हे गीत, श्रद्धा नाईक यांनी ‘या जन्मावर शतदा प्रेम करावे‘ हे गीत, डॉ. संजीव लिंगवत यांनी ‘दिवस तुझे हे फुलायचे‘, आदिती मसूरकर यांनी भावगीत सादर केले.

      कार्यक्रमाचे निवेदन प्रितम ओगले यांनी, प्रास्ताविक वृंदा कांबळी यांनी, काव्यवाचनाचे निवेदन पांडुरंग कौलापूरे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी अजित राऊळ, उद्घाटक जयप्रकाश चमणकर व सरपंच निलेश चमणकर यांचा आनंदायात्रींच्यावतीने सुधाकर ठाकूर व पांडुरंग कौलापुरे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Close Menu