कोकण विभागातील सर्वच जिल्ह्यांमध्ये हजारो सुक्ष्म, लघु उद्योग व व्यवसाय आहेत. आज कोकणाकडे ‘मुंबई‘ ही एक स्वतःची अशी प्रगत बाजारपेठ आहे. सद्यस्थिती मात्र अशी आहे की, मुंबईसहीत इतर जिल्ह्यांतील बाजारपेठांवर परप्रांतीयांचा पगडा जास्त आहे. इतर प्रांत, राज्य, बहुराष्ट्रीय कंपन्या कोकणाकडे ‘ग्राहक‘ (गिहाइक) म्हणूनच पाहतात. कोकणातील नैसर्गिक कच्चा माल (आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम, फणस, चिकू, जांभूळ, आवळा, चिंच इ.) कवडी मोलाने खरेदी करून त्यांवर प्रक्रिया करून ती उत्पादने कोकणातीलच बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी आणतात व कोकणातील पैशांनी आपली अर्थव्यवस्था बळकट करतात.
कोकणातील मुळस्थानिक शेतकरी, बागायतदार, व्यापारी, व्यावसायीक, कारखानदार, दुकानदार, किरकोळ विक्रेते यांनी अजूनही सावध व्हा, कोकणात जे पिकतच नाही किंवा अगदीच मिळत नाही त्या वस्तूंचीच बाहेरून खरेदी / व्यापार करा. संपूर्ण कोकण विभागातील (पालघर ते सिंधुदूर्ग) मुळस्थानिक व्यापारी/व्यावसायीकांचे नेटवर्क तयार करा व व्यापार/व्यवसाय करा. कोकणाची आपली स्वतःची अशी अर्थव्यवस्था तयार करा. कोकणातील आपल्या उत्पादनांवर ‘मेड इन कोकण‘ ही ओळ अभिमानाने लिहा व अशी उत्पादनेच खरेदी करा. आपल्या माणसांना नोकरीपेक्षा ‘उद्योगधंद्यात‘ उभे करा ते यशस्वी होण्यासाठी तुम्हांस जशी जमेल तशी मदत करा. परकियांचे ‘ब्रॅन्ड‘ विकण्यापेक्षा ‘कोकणातील ब्रॅन्ड‘ मोठे करा. कोकणातील प्रत्येक गोष्ट अमूल्य आहे. स्वतःची उत्पादने आवश्यकतेपेक्षा स्वस्त विकून बाजारपेठेतील स्वतःचे मुल्य/ किमत कमी करून घेऊ नका. परवडत नसेल तर नुकसान करून न घेता प्रक्रियेद्वारा मूल्यवर्धित उत्पादने तयार करा व फायद्यात रहा.
कोकणात अजूनही तांदूळ, खाद्यतेले, मसाले, कडधान्ये, बाटलीबंद पाणी, लाकडी वस्तू, भाजीपाला, मासे, फुलशेती, मध, वनौषधी, मासे, पर्यटन या क्षेत्रांमध्ये व्यावसायीक दृष्टिकोनातून काम करण्यास मोठा वाव आहे. कोकणात सर्वांकडे सर्वकाही आहे ‘संघटन‘ करून एकत्र रहा, उद्योगधंद्यात एकमेकांना पुरक व्हा. सोशल मिडीया पेक्षा प्रत्यक्ष ‘ऑनफिल्ड‘ सक्रिय व्हा. आपल्या पुढच्या पिढीस नोकरीत नाही तर उद्योगात पुढे आणा. इतर राज्य, विदेशातील आप्तस्वकियांची मदत घ्या व आपली उत्पादने निर्यातक्षम बनवून ती ‘निर्यात‘ करा. कोकणातील शहरांच्या तुलनेत ‘ग्रामीण‘ भागावर जास्त लक्ष केंद्रीत करा तिथे जास्त ‘संधी‘ आहे.
आपल्या ‘सिटी रिटर्न्स/ फॉरेन रिटर्न्स‘ यांच्या ज्ञान व अनुभवाचा फायदा करून घ्या. पर्यावरण पुरक प्रकल्पांवर जास्त भर द्या. कोकणातील निसर्गातच लाखो कोटींची गुंतवणूक खेचून आणण्याची निसर्गदत्त धमक आहे, त्याचा सुनियोजित वापर करून कोकण ही जगातील सर्वात श्रीमंत ‘इकोसिस्टिम‘ म्हणून नावारूपास आणणे शक्य आहे. रस्ते, नद्या, समुद्र, हवाई मार्गे ‘कार्गो यंत्रणा‘ व त्याचा शेती व शेतीपूरक उद्योगांशी समन्वय साधल्यास कोकणात ‘उद्योग -क्रांती‘ होवून ‘ब्रेनड्रेन‘ नक्कीच कमी होईल.
कोकण विकासासाठी आज खरी गरज आहे ती ‘सुसंस्कृत व इंटेलेक्च्युअल‘ राजकारण्यांची. नाहीतर कोकण ‘हायजॅक‘ व्हायला वेळ लागणार नाही याची काळजी प्रत्येक उद्योजक कोकणवासीयांनी घेणे आवश्यक आहे. कारण ‘संघटीत उद्योजकच‘ अनिष्ठ राजकारण काबूत ठेवू शकतात. पुढील काळात कोकणाच्या आर्थिक जडणघडणीत ‘शेतकरी उत्पादक कंपन्यांचे योगदान‘ महत्त्वाचे ठरेल हे निर्विवाद! पण तिथे देखील अनुदानाचे नाही, तर जातीचे निष्ठावंत, संघटीत स्थानिक शेतकरी हवेत. असे झाले नाही तर येणाया काळात कोकणात परप्रांतीयांच्या ‘शेतकरी उत्पादक कंपन्या‘ उभ्या राहतील. कोकणातील सर्वच उद्योगधंद्यामध्ये मुळस्थानिक मालकी/भागीदारी असलीच पाहीजे यांवर जास्त लक्ष केंद्रीत करा. प्रत्येक सुक्ष्म उद्योगात मोठा उद्योग व्हायची क्षमता असतेच मात्र उद्योजकाचा दृष्टिकोन ‘व्यापक‘ असावयास हवा. समस्येकडे शांतपणे पाहून त्यात संधी शोधतो तो खरा उद्योजक! चला तर मग कोकणातील उत्पादित जीवनावश्यक व इतर उत्पादने ‘मेड इन कोकण‘ उल्लेखासहित मार्केटींग करुया. – प्रा.नंदकिशोर परब (सिंधुदूर्ग) ९२२३८३८९१३