मराठी राजभाषा दिन हा मायमराठीचा गौरव करण्याचा, आपल्या मातृभाषेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असल्याने जेष्ठ साहित्यिक अजित राऊळ यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन जेष्ठ नेते बाळा सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नोकरीच्या निमित्ताने मुंबईत असताना श्री. राऊळ यांनी ‘साहित्य दरवळ मंच‘ या संस्थेची स्थापना केली. कविसंमेलने, अभिवाचन, दिवाळी अंकप्रदर्शन व पुरस्कार, विविध साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. प्रा.सुभाष भेंडे, डॉ.विजया वाड, डॉ.तुलसी बेहरे, नलेश पाटील, अशोक बागवे, साहेबराव ठाणगे, अरुण म्हात्रे, कवी सौमित्र अशा दिग्गज साहित्यिकांना आमंत्रित करून त्यांच्या व्याख्यानांचे व कविसंमेलनाचे आयोजन केले होते. महानगरपालिकेच्या आदर्श शिक्षक महापौर पुरस्काराने सन्मानित अजित राऊळ यांचे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झालेले असून प्रासंगिक व स्फुट विषयावरील लेखन प्रसिद्ध आहे. ‘विद्या‘ व ‘वाङ्मय‘ या विषयांना वाहिलेल्या ‘विद्यादर्पण‘ या त्रैमासिकाचे संपादन व प्रकाशन ते करीत असून सेवानिवृत्ती नंतर ते वेंगुर्ला आनंदयात्री वाङ्मय मंडळात उत्साहाने कार्यरत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन श्री.राऊळ यांना गौरविण्यात आले. यावेळी प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, मनवेल फर्नांडीस, प्रशांत खानोलकर, दादा केळुसकर विष्णू परब, सायमन फर्नांडीस, शैलेश जामदार, प्रकाश नांदोसकर, महादेव केरकर उपस्थित होते.