दिवाळीपर्यंत परतीचा पाऊस पडून सुद्धा वेंगुर्ला शहराला पाणीपुरवठा का होत नाही किवा पाणीटंचाई का होते? यासाठी एप्रिल २०१७मध्ये पाणी पुरवठा विभाग कर्मचा-यांच्या सहकार्याने नगराध्यक्ष दिलीप गिरप, नगरसेवक प्रशांत आपटे व येथील काही पत्रकारांनी सर्वे करीत ‘पाणी टंचाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट‘ केला. या सर्व्हेत निदर्शनास आलेल्या समस्यांचा अभ्यास करत नगरपरिषदेने यावर कार्यवाही करण्याचे ठरविले. त्यानुसार जीर्ण पाईपलाईन बदलणे, आवश्यक ठिकाणी पाण्याची टाकी व विहीर बांधणे, निशाण तलावातील चिकणमाती सदृश्य गाळ काढणे, विहिरींची खोली वाढविणे, विधंन विहिर बांधणे, मुख्य ओहोळावर भक्कम बंधारा बांधणे आदी कामांना प्राधान्य दिल्याने यावर्षी वेंगुर्ला शहरात पाणी टंचाई भासली नाही. शेवटपर्यंत पाणी राहिल्याने पाण्याचा टँकरही फिरविण्याची वेळ आली नाही.
या सर्व कामात महत्वाची भूमिका बजाविलेल्या वेंगुर्ला नगरपरिषदेतील पाणी पुरवठा विभागातील सर्व कर्मचा-यांची दखल घेत नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, नगरसेवक सुहास गवंडळकर, प्रकाश डिचोलकर, प्रशांत आपटे, कार्यालयीन अधिक्षक संगिता कुबल यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.