वेंगुर्ल्यात नाथ पै यांच्या नावाने सांस्कृतिक केंद्र उभारणार – पालकमंत्री सामंत

        राजापूर मतदार संघाचे लोकप्रिय माजी खासदार, संसदपटू बॅ.नाथ पै यांच्या ५०व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित ‘बॅ.नाथ पै‘ या पुस्तकाचे प्रकाशन बॅ.नाथ पै यांचे शालेय शिक्षण झालेल्या वेंगुर्ला शाळा नं.१ येथे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुस्तकाच्या लेखिका व नाथ पै यांची नात अदिती पै, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, रुची राऊत, नाथ पै शिक्षण संस्था कुडाळचे चेअरमन उमेश गाळवणकर, बॅ.नाथ पै यांचे सहकारी बाबुकाका अवसरे, बॅ.नाथ पै यांचे चिरंजीव शैलेंद्र पै, साहित्यिक प्रा.प्रविण बांदेकर, अॅड.देवदत्त परुळेकर आदी उपस्थित होते.

         वेंगुर्ला तालुक्यात बॅ.नाथ पै यांचे प्राथमिक शिक्षण झाले त्याठिकाणी त्यांच्या नावाने सांस्कृतिक केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी ५० लाख रुपये मंजूर करण्यात येतील अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी  दिली. 

      नाथ पै यांनी संसदीय लोकशाहीला फार मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाशी आम्ही स्पर्धा करु शकत नाही. कोकण रेल्वेच्या निर्धाराला गती देण्याचे काम त्यांनी केले. त्यांचे नाव चिपी विमानतळाला देण्याची आम्ही आग्रही राहू असे प्रतिपादन खासदार राऊत यांनी केले.

        तर आमदार केसरकर म्हणाले, सीमा प्रश्नावर भाषण करत असतानाच त्यांचे निधन झाले. नाथ पै यांच्या ५०व्या स्मृतिदिन वर्षात सीमा प्रश्न सुटल्यास तिच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. वेंगुर्ला केंद्रशाळा नं.१ मध्ये त्यांचे स्मारक होण्यासाठी १० लाखांची देणगी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

      आपल्या आजी-आजोबा, आत्या यांच्याकडून वेंगुर्ल्यातील नाथ पै यांच्या आठवणींच्या गोष्टी ऐकायला मिळत असत. त्यामुळे त्यांच्याबद्दलची उत्सुकता वाढली आणि हे पुस्तक लिहिण्यात आले. या पुस्तकात लिखाण हे पुष्पसेन सावंत, आना महाले, बाबुकाका अवसरे यांच्याकडून माहिती घेऊन केले असल्याचे अदिती पै यांनी सांगितले.

      सूत्रसंचालन सचिन वालावलकर यांनी केले तर आभार अॅड.देवदत्त परुळेकर यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu