आगामी होणारी वेंगुर्ला नगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्ष सिंधुदूर्ग जिल्हा कार्याध्यक्ष विलास गावडे यांच्या नेतृत्वाखाली लढवून नगरपरिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकवणार असल्याचा निर्धार काँग्रेसचे प्रभारी विनायक देशमुख यांच्या उपस्थित आज वेंगुर्ला येथे झालेल्या काँग्रेस पदाधिकारी बैठकीत करण्यात आला.
राहूल गांधींना देशाचे पंतप्रधान करण्यासाठी सिंधुदूर्ग जिल्ह्यातून काँग्रेसचा खासदार निवडून येणे आवश्यक आहे. त्याची बांधणी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका व जिल्हा परिषद निम्याहून जास्त काँग्रेसच्या ताब्यात स्वबळावर आणणे गरजेचे आहे. आगामी काळात खासदार, आमदार निवडून आणण्याचा एजेंडा काँग्रेसचा असुन येत्या सहा महिन्यात यशाची झलक दिसेल असे विधान अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सदस्य व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस, काँग्रेस प्रभारी विनायक देशमुख यांनी यावेळी केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी जनजागरण अभियान राबवित आहे. यामध्ये केंद्र सरकारने केलेले पेट्रोल, डिझेल, भाववाढ, महागाई याविषयावर जनजागरण करण्यासाठी सिंधुदूर्ग दौ-यावर काँग्रेस प्रभारी विनायक देशमुख असून आज वेंगुर्ला स्वामिनी मंगल कार्यालय येथे काँग्रेस कार्यकर्ता कार्यकारणी बैठक घेण्यात आली. यावेळी सिंधुदूर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बाळा गावडे, कार्याध्यक्ष विलास गावडे, महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, काँग्रेस पदेश प्रांतिक सदस्य इर्षाद शेख, माजी सभापती जगन्नाथ डोंगरे, ज्येष्ठ नेते दादा परब, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विधाता सावंत, शहराध्यक्ष तथा गटनेते प्रकाश डीचोलकर, कणकवली तालुकाध्यक्ष महेंद्र सावंत, कुडाळ प्रभारी तालुकाध्यक्ष विजय प्रभू, नागेश मोर्जे, सावंतवाडी काँग्रेसचे समीर वंजारी, नगरसेवक दादा सोकटे, कृतिका कुबल, उत्तम चव्हाण, अंकुश मलबारी, वैभव हळदणकर, समीर नागवेकर, सचिदांनद बुगडे, रावजी परब यांच्यासहीत काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील शेतकरी मच्छिमार व महिला यांच्याबरोबर सर्वसामान्यांचे प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी व पर्यटन वाढीसाठी मत्स्य बंदर विकास मंत्री अस्लम शेख व महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा जनता दरबार कार्यक्रम काँग्रेस भरविणार असून डिसेंबरमध्ये दौ-याचे आयोजन केले जाणार आहे. तसेच दर दोन महिन्यांनी पक्षवाढीचा आढावा घेण्यात येणार आहे असेही यावेळी श्री देशमुख म्हणाले. केंद्रातील भाजप सरकारने जाचक तीन कृषी कायदे रद्द केले त्याबद्दल हे यश काँग्रेसचे आहे असे असे सांगत यावेळी फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला.