बॅ. नाथ पै यांचे विचार आत्मसात करुन त्यांचा राजकीय वारसा पुढे नेण्याची आज गरज आहे. वेंगुर्ल्याच्या विकासासाठी पालकमंत्री म्हणून मी विकास निधी देत आहे. केसरकर यांनीही पालकमंत्री असताना भरपूर निधी दिला आहे. त्यामुळेच आज भाजी मार्केट, मच्छि मार्केट, झुलता पूल व अन्य विकासकामे झाली. मात्र काही लोक ‘आम्ही केलयं वेंगुर्लेने पाहिलयं‘ असे बोर्ड लावून फुकाचे श्रेय लाटण्याचे प्रयत्न करीत आहेत. बॅ. नाथ पै यांनी राजापूर मतदार संघात भरपूर विकास कामे केली. मात्र त्याचे श्रेय कधीच घेतले नाही. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आम्ही वाटचाल करीत आहोत. कटूता राजकारणात असावी मात्र ती विकासकामात नको असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी वेंगुर्ला येथे केले.
वेंगुर्ला नगरपरिषद व बॅ. नाथ पै फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला-कॅम्प येथे रविवारी बॅ. नाथ पै समुदाय केंद्राचा भुमिपूजन समारंभ उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार दिपक केसरकर, नाथ पै फाऊंडेशनच्या अध्यक्षा अदिती पै, शैलेश पै, नाथ पै कॉलेजचे चेअरमन उमेश गाळवणकर, वेंगुर्ला नगरपरिषदेचे प्रशासक प्रशांत पानवेकर, मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुका शिवसेना प्रमुख यशवंत परब, शहरप्रमुख अजित राऊळ, माजी नगरसेवक संदेश निकम, सुमन निकम, तुषार सापळे, रमण यावंगणकर, शिवसेना जिल्हाकार्यकारीणी सदस्य सचिन वालावलकर, युवा सेनाप्रमुख पंकज शिरसाट, मच्छिमार नेते भाई मालवणकर, माजी सभापती जयप्रकाश चमणकर, सुरेश भोसले, विवेक कुबल, तहसिलदार प्रविण लोकरे आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते बॅ. नाथ पै यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून तसेच समुदाय केंद्राच्या नामफलकाचे अनावरण करुन कार्यक्रमाचे उद्घाटन केले. एक वर्षाूर्वी वेंगुर्ला तालुका स्कुल नं. १ येथे झालेल्या बॅ. नाथ पै पुस्तक प्रकाशनाच्यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत व आमदार दिपक केसरकर यांनी बॅ. नाथ पै समुदाय केंद्रासाठी निधी देण्याचे मान्य केले होते. त्याप्रमाणे त्यांनी या समुदाय केंद्रासाठी २ कोटी रुपये देवून वचनपूर्ती केल्याने पालकमंत्री उदय सामंत, आमदार दिपक केसरकर यांचा अदिती पै यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कॅम्प येथे छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती साजरी केली जाते. येथेच बॅ. नाथ पै समुदाय केंद्र झाले तरी ती होणारच. त्याला कोणी विरोध करीत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही,असेहि पालकमंत्री सामंत म्हणाले.
बॅ. नाथ पै समुदाय केंद्र हे वेंगुर्ल्याच्या सौंदर्यात भर घालणारे ठरेल. या समुदाय केंद्रासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा नियोजनमधून एक कोटी रुपये मंजूर केले तर आपण एकनाथ शिंदे याच्या माध्यमातून ९५ लाख रुपये राज्य वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून दिले असल्याचे आमदार दिपक केसरकर यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे यांनी, स्वागत प्रशासक प्रशांत पानवेकर, सुत्रसंचलन स्वच्छता निरिक्षक म्हाकवेकर यांनी तर आभार अदिती पै यांनी मानले. यावेळी त्यांनी पालकमंत्री उदय सामंत, आमदार दिपक केसरकर, खासदार विनायक राऊत व सचिन वालावलकर यांनी या समुदाय केंद्रासाठी प्रयत्न केल्याने त्यांचे विशेष आभार मानले.