सावंतवाडीच्या राजवाड्याने अनुभवला शिवकाल

तलवारीचे आवाज, डोळ्याचे पाते लवते न लवते तोच होणारे दांडपट्टयाचे चौफेर वार आणि लाठ्याकाठ्यांच्या आवाजांनी सावंतवाडीच्या संस्थानच्या राजवाड्याने शिवकाल अनुभवला. निमित्त होते अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग व सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवकालीन युध्दकला प्रात्यक्षिकाचे.

     सावंतवाडी संस्थानच्या राजवाड्यात पारंपरिक मावळ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी आणि नऊवारी नेसून अफलातून संगीनी (तलवार) चालविणा­या महिला, मुलींनी जणू राजवाड्याचे प्रांगण शिवकाल अनुभवत होते. प्रत्येक शस्त्र आणि अस्त्रामागचा इतिहास ते चालविण्याची पद्धत, ऐतिहासिक संदर्भ विशद करत प्रत्यक्ष ते शस्त्र चालवून दाखवत मावळ्यांमधून शिवरायांनी उभ्या केलेल्या हिदवी स्वराज्याचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला. फिरगोजी शिंदे आखाडा कोल्हापूरचे वस्ताद प्रमोद पाटील, शिवराय पाटील यांनी युद्धकलेची चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवली.

     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावंतवाडी संस्थानचे राजे खेमसावंतभोसले होते. प्रमुख अतिथी राणीसाहेब शुभदादेवी भोसले, युवराज लखमराजे भोसले, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पै, अभिनव फाऊंडेशनचे संस्थापक ओंकार तुळसुलकर, युवा व्यावसायिक प्रतिक बांदेकर उपस्थित होते. यावेळी राजवाड्याच्या प्रांगणात प्रशिक्षणार्थी, विद्यार्थी त्यांचे पालक, शिवप्रेमींनी युद्धकलेची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी गर्दी केली होती.

    शालेय वयोगटापासून ते तरुण, तरुणी आणि महिलांमध्ये वीरश्री संचारली होती. एरव्ही मोबाईलच्या स्क्रीनवर आणि सोशल मिडीयावर फिरणारे विद्यार्थ्यांचे हात लाठीकाठी फिरवत आत्मसंरक्षणाचे धडे घेत होते.  शिवकालीन युध्दकलेचा आठवडाभर सराव सुरू होता. आत्मविश्वासाने भरलेले मन आणि मनगटे अचूक लक्ष भेद करतील अशी लाठीकाठी फिरवत होती. त्यांच्या तोडीस तोड महिला आणि मुलींनी तलवारी, दांडपट्टयाची प्रात्यक्षिके दाखवून उपस्थितांची वाहव्वा मिळवली.

    ‘विटाहे नाविन्यपूर्ण शस्त्र ज्याची नोंद इंग्रजांनी आपल्या गँझेटमध्ये केले आहे असे शस्त्र जे शत्रूवर हल्ला करून परत घेता येते. त्याची प्रात्यक्षिके वस्ताद पाटील यांनी दाखवली. नऊ वर्षाच्या विद्यार्थ्यांसह ६५ वर्षाच्या नार्वेकर-केसरकर यांनीही युद्धकलेची सुरेख झलक दाखवली. प्रशिक्षणार्थी अंकिता नेवगी, पल्लवी स्वार, आश्पाक शेख, सई नाटेकर, भार्गवी काशिद, किशोर सरनोबत, अमोघ पुराणिक, पालक, रंजिता देसाई, प्रिया नाटेकर, शितल टोपले, श्रुती गिरप, विवेकानंद जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.

        सात दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अभिनवचे खजिनदार जितेंद्र मोरजकर, किशोर चिटणीस, राजू केळूसकर, डॉ.प्रसाद नार्वेकर, तुषार विचारे, अमित अरवारी, अण्णा म्हापसेकर, अभिषेक देसाई, मंदार केरकर, हेमंत मराठे, विनोद वालावलकर, बाळू वालावलकर, वस्ताद प्रमोद पाटील, शिवराज पाटील यांनी विशेष मेहनत घेतली. सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. सावंतवाडी व मळेवाड येथे एकाचवेळी तीन बॅचमध्ये हे प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमश्री चिटणीस यांनी केले. आभार डॉ. नार्वेकर यांनी मानले.

 

 

 

 

Leave a Reply

Close Menu