‘व्यापारी एकता मेळावा’ उत्साहात संपन्न : जिल्हाभरातून उत्स्फू र्त प्रतिसाद

जिल्ह्यातील आणि तालुक्यातील मेळावा असल्याने त्यांनी दिलेल्या प्रेमाच्या हाकेला मी याठिकाणी आलो आहे. सिंधुदुर्ग जिल्हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. सिंधुदुर्गाचे नाव सर्वत्र आहे. पण व्यापाराच्या दृष्टीने सिंधुदुर्गचे नाव समृद्ध होत आहे असे वाटत नाही. माझा सिंधुदुर्ग जिल्हा व्यापाराच्या बाबतीतसुद्धा समृद्ध व्हावा, त्रुटी सोडविण्यासाठी त्यात सर्वांनी लक्ष घालावे. कुठलाही व्यवसाय करताना कठोर परिश्रम करीत नाही, तोपर्यंत प्रत्येक कामाला यश येणार नाही. त्यासाठी जिद्द, तळमळ, अहोरात्र काम करण्याची सवय पाहिजे. आज सिंधुदुर्गात व्यवसायाच्या प्रत्येक क्षेत्रात बाहेरचे लोक काम करतात. मग सिंधुदुर्गवासीय कुठे चुकतो आहे काय? यासाठी आत्मसंशोधन करण्याची गरज आहे. गोड बोलून आपला व्यवसाय होईलच असे नाही. त्यासाठी आपला दृष्टीकोन बदलला पाहिजे. नवीन पिढीच्या तरुण व्यापाऱ्यांनी खरोखरच लक्ष घातले पाहिजे असे आवाहन उद्योजक रघुवीर उर्फ भाई मंत्री यांनी केले.

      सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा 35 वा वार्षिक ‘व्यापारी एकता मेळावा‘ 31 जानेवारी रोजी वेंगुर्ला येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात संपन्न झाला. या मेळाव्याचे उद्घाटन उद्योजक रघुवीर तथा भाई मंत्री यच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन झाले. यावेळी व्यासपिठावर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी व वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, सारस्वत बँक संचालक सुनिल सौदागर, जीएसटी कौन्सिलचे सदस्य सीए उमेश शर्मा, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे, कंझ्युमर प्रॉडक्टस्‌ डिस्टीब्युटर्स सिंधुदुर्गचे अध्यक्ष अरविंद नेवाळकर, केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन सिंधुदुर्गचे अध्यक्ष आनंद रासम, परीट संघटना सिंधुदुर्गचे अध्यक्ष दिलीप भालेकर, कुक्कुट पालन व्यवसाय असोसिएशन सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रकाश म्हाडगुत, विजग्राहक संघटना सिंधुदुर्गचे अध्यक्ष संतोष काकडे, हॉटेल मालक उन्नत्ती संघ सिंधुदुर्गचे अध्यक्ष राजन नाईक, टोलमुक्त सिंधुदुर्ग कृती समितीचे अध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये, देवगड तालुका व्यापारी पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष प्रमोद नलावडे, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महांसघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, कार्यवाह नितीन वाळके, कोषाध्यक्ष अरविंद नेवाळकर, सहकार्यवाह राजू जठार, जिल्हा सदस्य राजेश शिरसाट, वेंगुर्ला तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष विवेक खानोलकर, सचिव राजन गावडे, खजिनदार सखाराम सौदागर उपस्थित होते.

      वेंगुर्ला इथल्या 35 व्या व्यापारी एकता मेळाव्यातील चर्चेअंती समोर येणाऱ्या समस्या आणि प्रश्‍न मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातुन सोडवण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. मंत्रीमंडळ बैठकीमुळे प्रत्यक्ष उपस्थित राहता न आल्याने मंत्री केसरकर यांनी या मेळाव्याला ऑनलाईन उपस्थिती दर्शवली.

      गेली 35 वर्षे हा उपक्रम सातत्याने सुरु आहे. या उपक्रमातून व्यापाऱ्यांच्या एकतेची मानसिकता दिसून येते. ऑनलाईन सेल्समधून व्यापाऱ्यांना त्रास होत आहे. ऑनलाईन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. व्यवसायात टिकण्यासाठी याला तोंड देणे आवश्‍यक आहे. सरकारशी भांडण, सवलती घेणे, ऑनलाईन शॉपिंगवर काही निर्बंध टाकायला भाग पाडणे हे काम संघटना करीत आहेतच. तरीदेखील जे सध्या करतो आहे ते करीत राहिलो तर याच्यावर फारसे उपाय सापडणार नाहीत. कोकण हा विभाग विविध उपक्रमासाठी अत्यंत उत्कृष्ट आहे. आपला व्यवसाय वाढविण्यासाठी इथे युनिक सेलिंग प्रपोझिशन तयार करण्याची गरज आहे. कोकणी उत्पादने मार्केट करण्याची गरज आहे. कोकणातून जेवढी उत्पादने बाहेर जातात त्यावर ‘मेड इन कोकण‘ असे लिहिणे आवश्‍यक आहे. तिच त्याच्या दर्जाची साक्ष देईल. इथली व्यापारी वृत्ती वाढावी. कोकणला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जावे. विकास व्हायलाच पाहिजे, पैसा यायला हवा. पण हे करताना विकासाचे पाश्‍चिमात्य होणे म्हणजे विकास नाही. आपली ओरिजनलेटी टिकविणे म्हणजे सुद्धा विकास आहे असे प्रतिपादन उमेश दाशरथी यांनी केले.

      कोकण आणि कोल्हापूरचे नाते भावाभावाचे आहे. सिंधुदुर्गाने हे नातं जपलेलं आहे. या महासंघाचे देशभर कौतुक होते. एखादा महासंघ वर्षातून व्यापार बंद ठेऊन एकत्र येतो. एकत्र येऊन चर्चा, विकास, अडचणी याबरोबरच एकमेकांना भेटण्यासाठी एक प्रभावी व्यासपिठ म्हणून सुद्धा या मेळाव्याचा उपयोग होतो. ईकॉमर्सचे होत असणारे आक्रमण हे व्यापाऱ्यांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. गेल्या 5 वर्षातील देशभरातील किरकोळ व्यापाऱ्यांचा सर्वे करण्यात आला. यात ऑनलाईन कंपन्यांच्या आक्रमणामुळे देशातील 30 टक्के किरकोळ व्यापार हे कायमचे बंद पडले. ही परिस्थिती अशीच राहिल्यास येणाऱ्या दोन ते तीन वर्षात 25 ते 30 टक्के किरकोळ व्यापार बंद पडतील. अशा प्रकारचे धोरण या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी ज्या ईकॉमर्समध्ये ठाण मांडून बसलेले त्यांनी स्वीकारलेले आहेत. गेले तीन वर्षे याबाबत सातत्याने केंद्रसरकारशी आपण संघर्ष करीत आहोत. ई कॉमर्सच्या व्यापाराची पॉलिसी सरकारने जाहीर करावी अशी आम्ही मागणी लावून धरलेली आहे आणि उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये ही पॉलिसी यावी अशी अपेक्षा आहे. तशी मागणीही चेंबर्स ऑफ कॉमर्सने केंद्रीय अर्थमंत्री यांच्याकडे केली आहे. व्यापार धोरण करणारे पहिले राज्य महाराष्ट्र आहे. अर्थसंकल्पपूर्व बैठकीत राज्यात व देशात स्वतंत्र व्यापार मंत्रालय निर्माण करण्यासाठी मागणीही केली आहे. व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि विकासासाठी महाराष्ट्र चेंबर्स आपल्या नेहमी पाठीशी राहील अशी ग्वाही ललित गांधी यांनी दिली.

      टुरिझम डेव्हलपमेंट डिपार्टमेंट यांच्याकडे नोंदणी असेल अशा हॉटेल व्यावसायीकांना व्यापारी वीज दर न लावता त्यांना औद्योगिक दर लावावा अशा स्वरुरपाचा जीआर महाराष्ट्र सरकारने केलेला आहे आणि या पिटीशनमध्ये असल्याची माहिती प्रताप होगाडे यांनी देत सिंधुदुर्ग जिल्हा विज ग्राहक संघटनेची कार्यकारिणी जाहीर केली.

      याच कार्यक्रमात रघुवीर मंत्री, ललित गांधी, उमेश दाशरथी यांचा सत्कार करण्यात आला. पहिल्या सत्रातील कार्यक्रमाचे प्रास्ताविक वेंगुर्ला व्यापारी अध्यक्ष विवेक खानोलकर यांनी, सूत्रसंचालन काका सावंत, जिल्हा सहकार्यवाह राजू जठार यांनी अहवाल वाचन केले.

      या मेळाव्यात एकूण सात ठराव घेण्यात आले आहे. त्यापैकी बेळगांव, कारवार, निपाणी, हल्ल्याळ, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात नोंदणी झालेल्या सर्वप्रकारच्या वाहनांना जिल्ह्यांतर्गत प्रवासासाठी कोणत्याही पद्धतीने पथकर आकारला जाऊ नये, बॅ. नाथ पै सिंधुदुर्ग विमानतळाचा वापर पूर्ण क्षमतेने करावा व मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई विमानसेवा आठवड्याचे सातही दिवस सुरू ठेवावी. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नातून सिंधुदुर्गात नियोजित आयटी पार्क, सीवर्ल्ड, किनारी मिनी ट्रेन आदी प्रकल्पांचे स्वागत, वस्तु व सेवा कर कायद्याच्या अंमलबजावणीच्या वेळी दिलेल्या अभिवचनानुसार फक्त महाराष्ट्रात अस्तित्त्वात असलेला व्यवसाय कर कायदा समुळ रद्द करावा, महाराष्ट्राच्या विधानपरिषदेमध्ये व्यापाऱ्यांचे खरे प्रतिनिधीत्व मिळण्यासाठी विभागनिहाय व्यापारी मतदार संघ निर्माण करावेत आदी महत्त्वाच्या ठरावांचा समावेश असून ठराव वाचन झाल्यानंतर उपस्थितांनी या ठरावांना दोन्ही हात उंचावून पाठींबा दर्शविला.

Leave a Reply

Close Menu