महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी डॉक्टर, इंजिनिअर, वकील या क्षेत्राप्रमाणे करिअरसाठी पत्रकारीता क्षेत्र निवडावे व त्यात क्षेत्रात नावलौकीक मिळावावा असे आवाहन फुले, शाहू, आंबेडकर विचार मंच वेंगुर्लाचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांनी पुरस्कार वितरण प्रसंगी केले.
वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाचा तालुकास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा सोमवारी पाटकर हायस्कूलच्या ज्युब्ली हॉलमध्ये संपन्न झाला. यावेळी व्यासपिठावर निवडणूक नायब तहसिलदार संदिप पानमंद, गटविकास अधिकारी मोहन भोई, प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ.राजन खांडेकर, जिल्हा दुग्ध उत्पादक संघाचे अध्यक्ष एम.के.गावडे, काथ्या कारखान्याच्या व्यवस्थापक प्रज्ञा परब, रा.कृ.पाटकर हायस्कूलचे मुख्याध्यापक दादा सोकटे, जिल्हा युथ असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास गावडे, शिवसेनेचे वेंगुर्ला तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम, राष्ट्रवादीचे वेंगुर्ला शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदिप सावंत आदी उपस्थित होते.
संजय मालवणकर कुटुंबियांकडून पुरस्कृत करण्यात आलेला कै. संजय मालवणकर स्मृती पुरस्कार दै.लोकमत व सा. किरातचे प्रतिनिधी प्रथमेश गुरव यांना गटविकास अधिकारी मोहन भोई यांच्या हस्ते, अरुण काणेकर कुटुंबियांकडून पुरस्कृत करण्यात आलेला कै. अरुण काणेकर स्मृती पुरस्कार सा.कोकण प्रभातचे संपादक योगेश तांडेल यांना निवडणूक नायब तहसिलदार संदिप पानमंद यांच्या हस्ते, पी.ए.केसरकर कुटुंबियांकडून पुरस्कृत करण्यात आलेला कै. पांडुरंग अनंत तथा शशिकांत केसरकर स्मृती पुरस्कार दै. पुढारीचे प्रतिनिधी अजय गडेकर यांना प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. राजन खांडेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप होते. दरम्यान, जिल्हा पत्रकार संघाचा ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार प्राप्त दै. पुढारीचे आरवली प्रतिनिधी एस.एस.धुरी यांचा जयप्रकाश चमणकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना योगेश तांडेल म्हणाले की, आपण गेली २० वर्षे पत्रकारीतेत आहे. या पुरस्काराने मला प्रेरणा मिळाली असून यापुढे आपण अधिक जबाबदारीने काम करीन. तर प्रथमेश गुरव म्हणाले की, तालुका पत्रकार संघाच्या ज्येष्ठ पत्रकारांकडून आपल्याला सतत मार्गदर्शन व सहकार्य लाभल्यामुळे आपण प्रामाणिकपणे पत्रकारीता करु शकल्याने आपणास हा पुरस्कार मिळाला आहे. यापुढेही आपण आदर्श पत्रकारितेचा वसा कायम ठेवीन.
पुरस्कारातून प्रेरणा मिळते व प्रेरणेतून राष्ट्र निर्माण होते. पत्रकारांनी समाजातील लोकांच्या समस्या व प्रश्नाला वाचा फोडताना प्रशासनाच्याही चुका दाखवून द्याव्यात. प्रिट मिडिया जीवंत राहिला तरच प्रसिद्धी माध्यमांत समतोल राहिल असे एम.के.गावडे म्हणाले.
पत्रकारीतेत आज फार मोठे बदल झाले आहेत. सर्वांवर अंकुश ठेवण्यासाठी पत्रकारांमध्ये निःपक्षपातीपणा, शोध घेण्याची वृत्ती, वेळेचे भान, संयम, संभाषण कौशल्य व समयसुचकता हे गुण आवश्यक असल्याचे डॉ.राजन खांडेकर यांनी सांगितले. आज पत्रकारांवर काही ठिकाणी हल्ले होण्याचे प्रकार घडत आहेत. पण पत्रकारांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवले पाहिजे असल्याचे संदिप पानमंद म्हणाले. श्रीनिवास गावडे, गटविकास अधिकारी मोहन भोई, मुख्याध्यापक दादा सोकटे यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष प्रदिप सावंत यांनी, सूत्रसंचालन महेंद्र मातोंडकर तर आभार सचिव अजित राऊळ यांनी मानले.