वृंदा कांबळी यांच्या साहित्यावर पीएचडीच्या प्रबंधात अभ्यासपूर्ण लेखन

कोकणातील लेखिका वृंदा कांबळी यांनी आपल्या साहित्यातून आदिमतेचा व गूढतेचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला जाणवतो. हा प्रयत्न ठरवून केलेला नाही. पण लेखिका ज्या निसर्गसंपन्न कोकणच्या भूमीत राहतात. त्यातील सांस्कृतिक स्पंदने त्यांच्या लेखनात जाणवतात. त्यांच्या साहित्यात त्यांच्या अवतीभवती वावरणारी माणसे आढळतात. सर्व वयाची, विविध व्यवसाय करणारी पात्रे असतात. असे वाटत राहते की, आपण यांना भेटलोय. सर्व पात्रे आपली वाटतात. भाषेचे पदरही एक बोली भाषेचे व निवेदनाची भाषा नागरी. यामुळे त्यांच्या लेखनात वास्तवता येते. त्यांनी आपल्या लेखनातून प्रादेशिकतेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तसेच स्त्रीकडे एक माणूस म्हणून पाहण्याची दृष्टी मांडली.लेखिका वृंदा कांबळी यांच्या साहित्याबद्दल रत्नागिरी येथील कवी, लेखक, पत्रकार प्रा.शंकर जाधव यांना बेळगांवच्या राणी चेनम्मा विद्यापिठाने जाहीर केलेले पीएचडीच्या प्रबंधात वरील उल्लेख केला आहे. १९६० नंतरच्या कोकणातील लेखिकांच्या साहित्याचा अभ्यास हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. कोकणातील प्रतिभावंतांचे साहित्य काहीसे दुर्लक्षित होते. या लेखिकांच्या साहित्याची दखल समिक्षकांनी फारशी घेतली नाही. याची खंत प्रा.जाधव यांना होती. कर्नाटक विद्यापीठ धारवाड येथे व ते मराठी विषयात प्रथम येऊन त्यांना रावसाहेब गोगटे गोल्ड मेडल मिळाले. शब्दवेणा‘  हा त्यांचा काव्यसंग्रह  प्रसिद्ध आहे. त्यांना डॉ.बाबूराव गायकवाड व डॉ.विनोद गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. वृंदा कांबळी यांनी आपल्या साहित्यावर संशोधनात्मक लिहिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. वृंदा कांबळी यांचे पाच कथासंग्रह, पाच कादंब­या, दोन ललित अशी बारा पुस्तके प्रकाशित असून यातील सहा पुस्तकांच्या दोन दोन तीन तीन आवृत्या निघाल्या आहेत. दोन कादंब­या व एक कथा संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत.

Leave a Reply

Close Menu