भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, अपेडा आणि सानप अॅग्रोअॅनिमल्स प्रा.लि. यांच्यावतीने कृषी पणन मंडळाच्या वाशी येथील विकीरण सुविधा केंद्र येथून अमेरिकेला देशातून प्रथमच आंब्याची समुद्रमार्गे निर्यात करण्यात आली. भारतीय आंबा प्रथमच समुद्रमार्गे अमेरिकेत रवाना झाला असून भारतीय आंंब्याच्या निर्यातीमधील हा ऐतिहासिक क्षण असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन संचालक तथा महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनिल पवार यांनी केले.
२०१९ मध्ये भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर, अपेडा, कृषि पणन मंडळ यांनी संयुक्तरित्या आंबा समुद्रमार्गे निर्यातीचा प्रयोग केला होता. या प्रयोगामध्ये आंब्यावर गरम पाण्याची प्रक्रिया, भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरने विकसित केलेल्या आंब्याच्या शेल्फ-लाईफसाठीची थंड पाण्यातील रासायनिक प्रक्रिया, विकिरण प्रक्रिया, प्रशितकरण आणि शितगृहात साठवणूक करुन आंब्याचा कंटेनर भरुन तो कृषी पणन मंडळाच्या विकिरण सुविधेच्या आवारात विद्युत पुरवठा देऊन ठेवण्यात आला होता. हा कंटेनर ३८ दिवसांनी उघडण्यात आला. या कंटेनरमधील आंबा सुस्थितीत होता. परंतु, त्यात काही त्रुटी आढळल्याने त्या दुरुस्त करुन पुन्हा कंटेनर ट्रायल घेणे आवश्यक होते.
आंबा हंगाम २०२२ मध्ये कंटेनर थेट अमेरिकेत पाठविण्याचे नियोजन करण्यात आले. दि.३० मे २०२२ पासून आंब्या सर्व प्रकारच्या प्रक्रिया करुन टप्प्याटप्प्याने आंबा कोल्डस्टोरेजमध्ये साठविण्यात आला होता. एकूण ५५२० बॉक्समधून १६ हजार ५६० किलो आंबा कंटेनरद्वारे पाठविण्यात आला. हा कंटेनर ३ जून रोजी जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट, न्हावाशेवा बंदाराकडे रवाना करण्यात आला. ५ जूनला तो अमेरिकेकडे रवाना झाला. हा कंटेनर अमेरिकेत नेवार्क या न्युजर्सी शहराजवळील बंदरात पोहचणार आहे.
या कंटेनरसाठी २९ मे २०२२ ते २ जून २०२२ असे पाच दिवस आंबा नोंदणीकृत बागांमधून तोडणी करुन कृषि पणन मंडळाच्या भाजीपाला प्रक्रिया केंद्र, वाशी-नवी मुंबई येथे आणण्यात आला. तेथे या आंब्याची प्रतवारी करुन त्यावर सोडिअम हायपोक्रोराईटची ५२ डिग्रीसेल्सीअस तापमानात तीन मिनिटांची प्रक्रिया करुन आंबा सुकविण्यात आला. त्यानंतर या आंब्यावर भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरने विकसित केलेल्या रसायनाची पाण्यामध्ये तीन मिनिटांची प्रक्रिया करुन पुन्हा आंबा सुविण्यात आला. नंतर हा आंबा तीन किलोच्या बॉक्समध्ये भरुन त्याची विकिरण सुविधा केंद्रात वाहतूक करुन त्याचे अमेरिकन इस्पेक्टर आणि एन.पी.पी.ओ.च्या अधिका-यांनी तपासणी केल्यानंतर त्यांच्या मान्यतेनंतर आंब्यावर विकिरण प्रक्रिय करण्यात आली. त्यानंतर आंबा प्रशितकरण करुन त्याची साठवणूक शितगृहात करण्यात आली होती.
आंबा कंटेनर पाठविताना अमेरिकेचे क्वारंटाईन विभागाचे इंस्पेक्टर डॉ.कॅथरीन फिडलर, एन.पी.पी.ओ.चे उपसंचाक डॉ.झेड.ए.अन्सारी, अपेडाचे उपसरव्यवस्थापक रविद्र सानप, अॅग्रोअॅनिमल्सचे संचालक शिवाजीराव सानप, वाफाचे अध्यक्ष अण्णा शेजवळ, ईक्राम हुसेन, मक्र्स कंपनीचे व्यवस्थापक रविद्रनाथन, बी.ए.आर.सी. आणि कृषि पणन मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. डॉ.गौतम यांनी प्रास्ताविकात तांत्रिक माहिती दिली.
आंब्याच्या समुद्रमार्गे निर्यातीमुळे आंब्याचा वाहतुक खर्च १० टक्क्यावर येणार असून त्यामुळे अमेरिकेतील बाजारपेठेत भारतीय आंबा स्पर्धात्मकरित्या उतरुन इतर देशांतील आंब्याशी स्पर्धा शकेल. तसेच समुद्रमार्गे निर्यातीमुळे आंबा सुमारे दीड महिन्याच्या जादा कालावधीसाठी तेथील बाजारपेठेत राहील. भारतीय आंब्याच्या इतिहासातील ही अत्यंत महत्त्वाची घटना असून आंब्याच्या निर्यातीमधील क्रांतीबदल होईल असेही सुनिल पवार म्हणाले.
कृषिमालाची निर्यात आणि कृषिमालाची साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर कृषी पणन मंडळास सर्वतोपरी मदत करेल. संधोधनात आम्ही मोठे काम करीत आहोत. आमचे संशोधन शेतक-यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषि पणन मंडळाने काम करावे असे आवाहन डॉ.टी.के.घंटी यांनी केले. कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ.भास्कर पाटील यांनी आंबा निर्यातीसाठी केलेल्या प्रक्रिया तसेच कामकाजाबाबतची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.