वेंगुर्ला नगरपरिषदेच्या कंत्राटी कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता दि. २ मे पासून अचानक कामावरुन कमी करण्यात आले. परंतु, त्यानंतर टेंडर मंजूर झाल्यावर सर्व कामगारांना कामावर हजर करुन घेण्यात येईल असे आश्वासन देऊनही अद्यापपर्यंत कंत्राटी कामगारांना कामावर हजर करुन घेतलेले नाही. एककिडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. तर दुसरीकडे कंत्राटी कामगारांची उपासमार होत आहे. नाविलाजाने १५ ऑगस्ट रोजी नगरपरिषदेसमोर उपोषण करीत असल्याचे लेखी निवेदन स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियनतर्फे तसेच ३२ कंत्राटी कामगारांनी आपल्या सहीचे स्वतंत्र निवेदन वेंगुर्ला मुख्याधिकारी यांना दिले आहे.
वेंगुर्ला नगरपरिषदेमध्ये गेली १५ ते २० वर्षे या कंत्राटी कामगारांनी योगदान दिले आहे. ज्या कामगारांनी आपल्या नगरपालिकेला नामांकन मिळवून दिले. कोट्यावधीची बक्षिसे मिळवून दिले. कोरोना काळात जीवावर उदार होऊन लहान मुलांना घरात ठेऊन शहरातील नागरिकांची आरोग्याची काळजी घेतली, त्याच कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कंत्राटी कामगारांच्या पूर्नभरतीसाठी कामगार संघटनेचे पदाधिकारी वारंवार मुख्याधिकारी यांची भेट घेत होते. परंतु, आपणाकडून टेंडर आले नाही, पुढच्या महिन्यात बघू, पुढच्या आठवड्यात बघू अशा पद्धतीने गेले तीन महिने कंत्राटी कामगारांना झुलवत ठेवले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
पूर्वीपासून काम करणा-या कंत्राटी कामगारांना तत्काळा कामावर रूजू करा, गेले कित्येक महिने कामगारांच्या पगारातून ठेकेदाराने जी.एस.टी. कपात केला तो परत करा, ठेकेदाराने कामगारांना न सांगता आपल्या पगारातून सलग तीन महिने एक एक हजार दोन वेळा तर एक वेळा पाचशे रुपये कपात केले; त्याची चौकशी व्हावी, प्रत्येक कामगारांच्या पगारात पी.एफ. कपात होतो, तो वेळच्यावेळी दरमहा भविष्य निर्वाह निधी खात्याकडे भरला जातो की नाही याची खात्री करावी अशाही मागण्या कंत्राटी कामगारांनी केल्या आहेत.
१५ ऑगस्ट रोजी होणारे उपोषण हे आय.एल.यु.महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे अध्यक्ष सागर तायडे यांच्या नेतृत्वाखाली शांतता, विधायक आणि संविधानात्मक मार्गाने करणार असल्याचे म्हटले आहे. उपोषणा दरम्यान, कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अगर कोणत्याही कामगारांचे बरेवाईट झाल्यास त्यास नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात नमुद केले आहे.