किरातच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन
महाराष्ट्राला दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा लाभली आहे. दिवाळी अंकांच्या माध्यमातून अनेक साहित्यिक घडले आहेत. शतक महोत्सवी साप्ताहिक किरातने देखील ही परंपरा जपत कोकणातील नवोदित लेखक – कविना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले असल्याचे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक अॅड.देवदत्त परुळेकर यांनी किरात दिवाळी अंकाच्या प्रकाशानावेळी केले. दिवाळी अंक प्रकाशन करण्याचे किरातचे हे ४१वे वर्ष आहे.
वेंगुर्ला येथील साप्ताहिक किरातच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन नरकचतुर्दशीच्या पूर्वसंध्येला किरात कार्यालयामध्ये नाट्यकर्मी केदार देसाई, ज्येष्ठ कवी वीरधवल परब, किरातचे हितचितक अनंत आठल्ये, निवृत्त मुख्याध्यापक रमण किनळेकर, किरातचे विश्वस्त प्रशांत आपटे, अॅड.शशांक मराठे, किरात व्यवस्थापक सुनिल मराठे, अशोक कोलगांवकर, केदार आपटे, संपादक सीमा मराठे यांच्या हस्ते झाले.
आज प्रथित यश असलेल्या सिंधुदुर्गातील लेखक कवींचे साहित्य सुरुवातीला किरातमधूनच प्रसिद्ध झाले होते. सर्वसमावेशकता हेही किरातचे वैशिष्ट्य राहिले असल्याचे मत वीरधवल परब यांनी व्यक्त केले. किरात अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत साकारलेल्या मुखपृष्ठाचे कौतुक करत किरातच्या वाटचालीस सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. लक्ष लक्ष बलिदान लेवुन आज भारत भूमीला मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्याची जबाबदारी ही आपणा सर्वांची आहे असे मत ज्येष्ठ सदस्य अनंत आठल्ये यांनी व्यक्त केले. केदार देसाई यांनी स्वतः लिहिलेल्या कवितेचे वाचन केले.
साप्ताहिक किरात यंदा शतक महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. १९२२ मध्ये स्थापना झालेल्या या साप्ताहिकाने देशाचा स्वातंत्र्यदिन पाहिला आणि यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अनुभवण्याचे भाग्यही लाभले आहे. यावर्षी किरातच्या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला समर्पित केले आहे.
नाट्ययकर्मी केदार देसाई यांनी अतिशय समर्पक अशा कवितेतून शहिदांना मानवंदना दिली आहे. चित्रकार सुनील नांदोस्कर यांच्या कुंचल्यातून रेखाटलेले मुखपृष्ठ आणि कॅलिग्राफीने अंक लक्षवेधी ठरला आहे.
मुलाखत विभागात आपल्या अभिनय कौशल्यासोबतच मातीशी नाळ जोडून असलेले सह्याद्री देवराईचे संस्थापक सयाजी शिंदे, वाचकांवर ‘एक होता कार्व्हरचे‘ गारुड असलेल्या वीणाताई गवाणकर, ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांचा समावेश आहे. मेधा फणसळकर, अपर्णा परांजपे प्रभू, पियुशा प्रभू तेंडोलकर, मेघना जोशी, गंगाधर सबनीस, प्रमोद केळकर, दीपक पेठे यांनी लिहिलेले लेख वाचकांना नक्कीच प्रेरणादायी ठरतील.
सुप्रसिद्ध साहित्यिक अरुण सावळेकर यांनी पुरस्कृत केलेल्या खुल्या कथालेखन स्पर्धेतील पारितोषिक विजेत्या सहा कथा तसेच विविध विषयांवरील लेख, कविता, राशीफल आणि मिश्किली अशी भरगच्च साहित्यिक मेजवानी या दिवाळी अंकातून वाचकांना मिळणार आहे.