वेंगुर्ल्यात सामुदायिकरित्या श्रावणी संस्कार संपन्न

हिदू परंपरेत श्रावणी हा धार्मिक संस्कार सांगितला असून २० ऑगस्ट रोजी वेंगुर्ला-कुबलवाडा येथील एकमुखी दत्तमंदिरात सामुदायिकरित्या श्रावणी संस्कार साजरा केला. यावेळी बहुसंख्य ब्रह्मवृंद उपस्थित होते.

             मौजीबंधन झालेल्या प्रत्येक व्यक्तीने गळ्यात यज्ञोपवीत (जानवे) धारण करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक यज्ञोपवीत जानवे तीन सूत्रांचे (दो­याचे) असून त्यावर तीन वेद, त्रैलोक, तीन अग्नी, तीन ऋणे यांचा वास असतो. प्रत्येक जानव्याच्या ब्रह्मगाठीवर ओंकार नाद व तीन मात्रा वास करतात. गाठी बाहेरील टोकावर गायत्री देवीचा वास असतो. हा विधी म्हणजे एकप्रकारे आनंदोत्सव असतो. यावेळी दोन हवने करण्यात येतात. पहिल्या हवनात मागील वर्षभरात झालेल्या वाईट घटना, अन्य दोषांबाबत प्रायश्चित्त घेण्यात येते. यावेळी माती, भस्म, गोमूत्र, गोमय, दर्भाने आंघोळ केली जाते. त्यानंतर शारीरिक, मानसिक शुद्धी होण्यासाठी पंचगव्याचे प्राशन होते. त्यानंतर देवी अरूंधतीसह सप्तऋषींची पूजा केली जाते. मनोभावे उपस्थित ज्ञातीबांधव त्यांची पूजा करतात, आशीर्वाद घेतात. यानंतर पुढील वर्षभरात चांगले आयुष्य, आरोग्य लाभण्यासाठी अग्नीदेवतेची प्रार्थना करून नवीन यज्ञोपवीत धारण केले जाते. यावेळी नवीन यज्ञोपवीत व काही धनाचे दानही केले जाते. यज्ञोपवीत धारण केल्याने बुद्धीचे प्रज्ञेत परिवर्तन होते. यज्ञोपवीत अत्यंत प्रवित्र असून हे भगवान प्रजापतीमधून उत्पन्न झाले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Close Menu