परूळे येथील सेल्समन जयवंत राऊळ यांनी वराडी मंगल कार्यालयात आयोजित केलेली वेंगुर्ला तालुका रास्त भाव धान्य दुकानदार कर्मचारी संघटना यांची सभा ३ जानेवारी रोजी परुळे संस्था चेअरमन तथा कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, व्हाईस चेअरमन प्रसाद पाटकर, भोगवे संस्था चेअरमन चेतन सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत व वेंगुर्ला रास्त भाव धान्य दुकान कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
धान्य दुकानदार कर्मचारी यांनी पुढे येऊन आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी संप पुकारला, तो योग्य आहे. या संपास आम्हा संस्था चेअरमनचा पूर्ण पाठींबा आहे. अजूनही काही मदत लागल्यास संघटनेने निर्भयपणे सांगावे. त्यासाठी लागेल ती मदत आम्ही संस्था चेअरमन व सरपंच या नात्याने तुम्हाला असे आश्वासन निलेश सामंत यांनी दिले. तात्या हाडये संस्थांच्या फायद्यासाठी झटत असतात. या वयातही त्यांनी आज पुढाकार घेतला. जरी आमचे नुकसान झाले तरी भावी पिढीत संस्था कर्मचायांचे नुकसान होऊ नये म्हणून शासनाच्या ज्या ज्या योजना सवलती आहेत, त्या धान्य दुकानातील कर्मचायांना सुद्धा मिळाव्यात हे आपले प्रामाणिक मत असल्याचेही सांगितले.
आज धान्य दुकानदार कर्मचारी संघटना आपल्यासाठी संस्थांकडे काहीच मागत नाहीत, त्यांचा शासनाबरोबर लढा आहे तो संस्थांना योग्य कमिशन मिळावे, नेट सर्व्हरची समस्या दूर करावी, नविन मशिन द्याव्यात, धान्य व्यवस्थित मोजून व योग्य प्रतिचे द्यावे. इष्टांक वाढवून जे रेशन कार्ड धारक अजूनही धान्यापासून वंचित आहेत त्यांना शासनाने धान्य मिळवून द्यावे असे चेतन सामंत यांनी स्पष्ट केले. वजराटचे सेल्समन रविंद्र पेडणेकर यांनी, आम्ही सर्व धान्य दुकानदार कर्मचारी यांचा आमचे अध्यक्ष तात्या हाडये यांना बिनशर्त पाठींबा असल्याच सांगितले. या सभेत जिल्ह्याबरोबर देशव्यापी संपाबरोबर मागण्या पूर्ण होईपर्यंत एकनिष्ठेने राहण्याचा निर्णय सर्वांनी घेतला.