कोकणात माकड आणि वानर हे दोन प्राणी नसले तर कोकण समृद्ध होईल. गेली कित्येक वर्षे न मारल्यामुळे काही वर्षात यांची संख्या शंभरपटीने वाढली आहे. आज लाखो रुपयांचे कष्ट पाण्यात जात आहेत. हे दुःख कोणाला समजेल काय? आंबा राखणीसाठी आज लाखो रुपये खर्च होत आहेत. केळी, भाजीपाला, नारळ, फळभाज्या, फणस, चिकू, पेरू, पपई, शेवगा, कुळीथ, उडीद इ.चे लाखो रुपयांचे उत्पन्न ही जोडी आणि त्यांची प्रचंड वाढलेली जमात फस्त करते.शिवाय नळे, पत्रे फोडणे यांचे नुकसान वेगळे. माकडे तर घरात घुसून नासधूस करायला लागली आहेत. अंगावर येण्याचे धैर्य त्याच्याकडे वाढत चालले आहे. आर्थिक नुकसान, हाकलण्याचे शारीरिक नुकसान आणि वेदना, हतबलता चे मानसिक नुकसान… किती सोसायचे? नक्कीच यामध्ये आता शेकरू या प्राण्याचा पण शिरकाव झाला आहे. जे माकडापेक्षा भयानक आहे. जे नारळ कोवळे असताना झाडावरच सोलून खाते आणि हाकवल्यावर सुद्धा जात नाही.या सर्व प्राण्यांमुळे गोरगरिब शेतकरी जे चवळी, कुळीथ, वाली, भुईमूग,आणि इतर भाजीपाला पिकवून आपला रोजचा खर्च चालवायची. त्यांना आता भूकबळी होण्याची परिस्थिती आली आहे. अशीच परिस्थिती राहिली तर सरकारने शेतकऱ्यांना दत्तक घ्यावे लागेल.
मागे मी पंतप्रधान कार्यालयाकडे याबाबत मांडले होते. त्यावेळी वनाधिकारी माझ्याकडे येऊन नुकसान भरपाई जीआर देऊन गेले. त्यात प्रचंड त्रुटी आहेत. हे त्यांनाही माहीत आहे. पंचनामा त्यावरील सह्या, खाल्लेले नुकसान कसे दाखवणार, राखणसाठी होणारा त्रास, नळे, पत्रे फोडलेले इ. बाबत भीक नको पण कुत्रा आवर अशी स्थिती आहे. आज आम्ही कोकण सोडून इतर ठिकाणच्या भाजीपाला, शेवगा, चिकू, पेरू, केळी यांच्या बहरलेल्या बागा पाहतो. आम्ही आंबा, पपई, शेवगा, चिकू, पेरू, केळी, भाजीपाला इ. चे प्रचंड उत्पादन घेऊ शकतो. पण आम्ही हतबल आणि असहाय आहोत. खरतर कुणी वालीच नाही असं झालंय.
हिमाचल प्रदेश मध्ये वानर आणि माकडे यांना उपद्रवी पशु जाहीर करून मारायला सुरुवात केली. शिवाय मारण्यासाठी अनुदान देणे सुरू केले असे वाचनात आले. महाराष्ट्रातसुद्धा असं करण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात कोकणातील शेतकरी आत्महत्या करू लागला तर आश्चर्य वाटायला नको. आज कोकणातील शेतकरी आत्महत्या करत नाही, कारण इथे एक पीक द्धतीऐवजी बहुपिक पद्धत आहे. दोन माड, दोन फणस, थोडी शेती, दोन कलमे, चार जांबी इ. प्रत्येक घरात असल्याने त्याला काहीतरी मिळतं. मात्र आज वानर, माकडांनी त्यावर घाला घातला आहे. कोकणातील ग्रामीण भागातील ही परिस्थिती कोणी लक्षात घेईल काय? शहरात बसून सल्ले देणे खूप सोपे आहे. एकदा राहून अनुभवा..
या परिस्थितीतून कोकणी माणसाला दिलासा मिळेल काय? माणूस जगला पाहिजे की प्राणी जगला पाहिजे हे सुद्धा एकदा ठरवण्याची गरज आहे. सरकार उपद्रवी पशु म्हणून वानर, माकडे याना जाहीर करेल काय? नाहीतर रीतसर पत्र देऊन महिनाभरात आता उपोषणाला बसणार आहे.
– अविनाश काळे, ९४२२३७२२१२
