वेंगुर्ला तालुक्यातील भाजपाने जाहीर आवाहन करुन सुद्धा ‘आंगण ते रणांगण‘ आंदोलनात अवघे १० ते १२ लोक उपस्थित होते. याचाच अर्थ कोविड सारख्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जो प्रयत्न केला आहे तो महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला मान्य आहे. असा त्याचा अर्थ होतो. पाण्यातून मासा बाहेर काढल्यावर जसा तडफडतो तशी भाजपाची राज्यातील सत्ता न मिळाल्यामुळे सत्तेसाठी असलेली ही केविलवाणी धडपड असल्याचे वेंगुर्ला तालुका शिवसेना प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी प्रसिद्धीपत्रकातून म्हटले आहे.
भाजपाने राज्य सरकारच्या विरोधात शुक्रवार ‘आंगण ते रणांगण‘ असे आंदोलन केले. वेंगुर्ल्यातील या भाजपाच्या आंदोलनाला तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी प्रसिद्धीपत्रकातून उत्तर दिले आहे.
या आंदोलनामध्ये सहभागी असलेले व स्वतःला भाजपाचे निष्ठावान समजणारे नगराध्यक्ष व काही नगरसेवक एकिकडे ठाकरे सरकारच्या विरोधात रस्त्यावर येऊन घोषणा देतात व दुसरीकडे ठाकरे सरकारचेच असलेले उच्च व तंत्र शिक्षणमंत्री व सिधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे आपल्या कामासाठी त्यांच्या घराचे उंबरे झिजवत असतात. बाळासाहेबांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात शिवसेनेचेच बोट धरुन आपण मोठे झालो हे भाजपाने विसरुन जाऊ नये असेही तालुकाप्रमुख परब यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.