वेंगुर्ला-मठ येथील स्वयंभू मंगल कार्यालयात ७ नोव्हेंबर रोजी दशावतार कलाकारांचा ऐक्य शक्ती प्रदर्शन मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला अनेक लोकप्रतिनिधींना निमंत्रित केले होते. परंतु, त्यातील फक्त दोन ते तीनच लोकप्रतिनिधी उपस्थित राहिल्याने दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघाचे जिल्हा अध्यक्ष पुरूषोत्तम कोचरेकर यांनी तीव्र संताप व्यक्त करत यापुढे दशावतार कलाकारांच्या मागण्या आणि या संघाच्या मागण्या जो लोकप्रतिनिधी आपल्या पक्ष माध्यमातून पूर्ण करेल आणि न्याय देईल तोच आपला देवस्वरूप प्रतिनिधी असेल. जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर एकाही कलावंताने व त्याच्या आर्थिक बळावर जगणा-या संपूर्ण कुटुंबाने आगामी निवडणुकांना मतदान करू नये असे आवाहन उपस्थित कलाकारांना केले. उपस्थितांनीही याला टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद देत ‘तुम लढो, हम तुम्हारे साथ है‘ अशाप्रकारच्या घोषणा देत संमत्ती दर्शविली.
दशावतार कलाकाराला शासनाकडून मिळणारी मदत ही कलाकारांच्या बँक खात्यावर वर्गवारी होणे, शासन ओळख पत्र मिळणे, कलाकाराचा सर्वांगीण विकास अशा विविध कारणाने हा कलाकार वर्ग एकत्र आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दयानंद शेणई यांनी तर प्रमुख पाहुणे म्हणून समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी भूषविले. या मेळाव्यात ज्येष्ठ कलाकार जयसिग राणे, मधुकर दळवी, यशवंत तेंडोलकर, चालक मालक संघाचे मालक केशव खांबल व शांती कलिगण, प्रत्येक तालुकाध्यक्षांसह सामाजिक कार्यकर्ते एम.के.गावडे यांचा सत्कार करण्यात आला. दत्तप्रसाद शेणई यांनी अहवाल वाचन केले. श्री.नेवगी यांनी पुढील वाटचाल कशी असावी याबाबत मार्गदर्शन केले. रविद्र खानोलकर यांनी सूत्रसंचालन तर मोरेश्वर सावंत यांनी आभार मानले.