सिधुरत्न समृद्ध योजना पुढील एक ते दीड वर्षात मोठे यश मिळविल. त्यामुळे देशातील इतर पर्यटक ही योजना पहाण्यासाठी येतील. या योजनेसाठी महाविकास आघाडी कुठेही कमी पडणार नाही. यापुढेही नेहमी कोकणी माणसाच्या सोबत राहून कोकणचा शाश्वत विकास करु असे आश्वासन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी वेंगुर्ला येथे दिले.
वेंगुर्ला येथील मधूसुदन कालेलकर सभागृहात सिधुरत्न समृद्ध योजनेचा लोकार्पण सोहळा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी व्यासपिठावर पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, सिंधुरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना नेते संदेश पारकर, सतीश सावंत आदी उपस्थित होते.
पर्यटन मंत्री श्री.ठाकरे म्हणाले, आरमार इस्डाचे मॉडेल क्वेटिक टुरिझम सिंधुदुर्गमुळे राज्यात सुरु झाले आहे. मुंबईच्या विकासात कोकणी माणसाचा सिंहाचा वाटा आहे. कोकणी माणसासाठी शाश्वत विकासाचे मॉडेल राबवायचे आहे. कोकणाचा शाश्वत विकास कसा करायचा यावर लक्ष केंद्रीत केले आहे. गेली २५ वर्षे प्रलंबित असणारी दोन्ही मोठी हॉटेल पुढील तीन वर्षात होतील. सिंधुरत्न योजनेला पुढील एक ते दीड वर्षात यश येईल. त्यासाठी आम्ही कोठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिधुदुर्गच्या दौ-यात विमानतळ, मेडिकल कॉलेजसोबतच रत्नागिरी आणि सिधुदुर्गच्या विकासाला चालना मिळण्यासाठी ही योजना सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. यावर अनेकांनी टीका केली, टमणेही मारले. परंतु, ही सर्व आश्वासने त्यांनी पूर्ण केली आहेत. करोडो रुपयांची विकासाची कामे करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
आमदार केसरकर म्हणाले की, सिंधुरत्न योजनेचे एकमेव श्रेय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जाते. काजूचा टर्नओव्हर ६ हजार २०० कोटीचा आहे. तो ९ हजारपर्यंत नेवू शकतो. इथला बागायतदार आता आंतर पिकात हळद, मसाल्याची रोपे तयार करत आहे. २० हजार हेक्टरवर दुबार पीक घेतो आहे. नवाबागमधून फिशिंग व्हिलेज सुरु होणार आहे. माणसाचं उत्पन्न दुप्पटकरायचे आहे. या सर्वात पर्यटन हा सर्वांचा गाभा राहिला पाहिजे.
खासदार श्री राऊत म्हणाले, पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याला अत्युच्च शिखरावर नेवून ठेवण्याचे काम या योजनेच्या माध्यमातून होईल. सबमरीन पर्यटनाचा प्रकल्प अंमलात आणाल. या योजनेच्या माध्यमातून रत्नागिरीचा विकासही कराल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर वायंगणी महोत्सव कासव जत्रा, सबमरीन प्रकल्प माहिती पट दाखविण्यात आला. तसेच सिंधुरत्न योजनेचे सादरीकरण करण्यात आले. वेंगुर्ला येथील अंकुर वस्तीस्तर संघ, स्त्रीशक्ती वस्तीस्तर संघ यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले. तर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी आभार मानले.