राज्य अंगणवाडी कृती समितीतर्फे महाराष्ट्रभर १ लाख ५ हजार ५९२ मोबाईल परत करण्याचे आंदोलन १७ ऑगस्टपासून सुरू आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून वेंगुर्ला तालुक्यात मोबाईल वापसी आंदोलन करण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविकांनी प्रकल्पाधिकारी श्रमिष्ठा सामंत यांच्याकडे १५० पैकी १४६ मोबाईल परत केले. उर्वरित चार मोबाईल मागावून परत करण्यात येणार आहेत.
यावेळी कमलताई परुळेकर म्हणाल्या, १७ सालात खरेदी केलेला हा मोबाईल दोन वर्षे गोडावूनमध्ये राहिल्यानंतर मार्च २०१९ ला हातात आला. पॅनासॉनिक कंपनीचा हा मोबाईल २ जीबीचा असल्याने लाभार्थीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत कुपोषणापासून आहारापर्यंत सर्व गोष्ठी यात सेव कराव्या लागतात. त्यामुळे हा मोबाईल हॅग होतो.
पोषण ट्रॅकर नावाचे चांगले अॅप शासनाने दिले. मात्र, काही सरकारी मोबाईलमध्ये ते डाऊनलोड होत नाही. त्यामुळे खासगी मोबाईल वापरण्याची सक्ती केली जाते. ५९९ रुपये तिमाही रिचार्ज चे पैसे जरी मिळाले, तरी न चालणा-या मोबाईलवर ते भरावे लागतात. मात्र, खासगी मोबाईलचे पैसे कोण भरणार? तसेच पोषण ट्रॅकर इंग्रजीत आहे. इंग्रजी न जाणणा-या सेविका आहेत. त्यांची अडचण होते. काही दुरुस्ती करुन मागितल्यावर प्रश्नावली मराठीत मात्र उत्तरे इंग्रजीत त्यामुळे हे ट्रॅकर मराठीतून मिळावे या मागणीकडे अध्यक्ष, सचिव, आयुक्तांचे लक्ष वेधले आहेत. मात्र अद्याप कार्यवाही झाली नाही म्हणून हे मोबाईल आम्ही परत केल्याचे कमलताई परुळेकर यांनी सांगितले. यावेळी माधवी ठाकुर, मयुरी राणे, कविता बुगडे, कांचन आरोलकर, मनीषा साळगांवकर, संध्या कोनकर आदी बिट प्रमुख उपस्थित होत्या.