देवदिवाळी – संस्कृती आणि शेतीचे धागे विणणारा सण

    कोकणातला बैलपोळा म्हणजे देव दिवाळी. आपल्या कृषिप्रधान संस्कृती मधील महत्त्वाचा सण. ‘मार्गशीर्ष प्रतिपदा‘ या दिवसाला कोकणात आगळेच महत्त्व आहे. कोणत्याही संस्कृती कोशात व धार्मिक व्रतवैकल्यांच्या ग्रंथात माहिती नसलेला सण म्हणजे देवदिवाळी.  सर्जा-राजा वा ढवळ्या-पवळ्या या बैलजोडीच्या शिंगांना रंग फासण्याचा त्यांना गोंडे बांधण्याचा हा दिवस. गाई, बैल, वासरे, म्हशी, रेडे यांच्या शिंगांना रंग लावून, त्यांना गोडधोड खायला घालून हा सण साजरा करण्याची प्रथा आहे.

      दिवाळी येते ती शरद ऋतुचा आनंद मनात घेऊनच! आपली भारतीय संस्कृती ही शेतीवर आधारलेली आहे. शारदीय नवरात्र आणि दसरा संपला की पाठोपाठ कोजागिरीची रात्र पूर्ण चंद्रबिंब घेऊन येते. आटवलेल्या केशरी दुधासह आपण ही रात्र जागवतो. या दिवसाला ‘नवान्न पौर्णिमा‘ असेही म्हणतात.

      कारण शेतातून नुकत्याच हाती आणलेल्या धान्याची कणसे देवीला अर्पण केली जातात. या समृद्धीचा आनंद मनात असतानाच पाठोपाठ रमा एकादशी येते. आपण ज्या काळात दिवाळी साजरी करतो त्या काळात अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. पण ज्यावेळी समाज अधिक प्रमाणात फक्त शेतीवर अवलंबून होता. त्याकाळात शेतात पिकलेले धान्य ज्यावेळी कोठारात भरेल आणि विकले जाईल तो काळ समृद्धीचा मानला जाणे स्वाभाविक होते. त्यामुळे धान्याची मुबलकता असताना आणि शरद ऋतुचा आल्हाद असताना दोन्हीचा एकत्र आनंद घेण्यासाठी दिवाळी सणाची योजना झालेली दिसते. प्रसिद्ध गोवंश अभ्यासक व पशुतज्ज्ञ मिलिंद देवल यांनी या सणामागची कारणमिमांसा फार चिकित्सकपणानं उलगडून दाखवलीय.

ओला-चारा बैल माजले- लेझीम चाले जोरात शेतकरी मन प्रसन्न झाले- ढामटीकी ढूमढूम।।

     एका सुप्रसिद्ध मराठी कवीच्या या ओळी सत्यातच उतरलेल्या असतात.  शेतक­-याला ‘बैल‘ हा जीवाभावाचा सखासोबती वाटतो. कोकणातली थंडी म्हणजे हाडं गोठवणारी. याच काळात ओला चारा कसदार झालेला असतो. कोवळी उन्हं आल्हाददायक वाटू लागतात. अशावेळी कोकणातील शेतकरी जवळजवळ शेतीच्या कामातून मोकळा झालेला असतो. उन्हाळी भाजीपाला, नाचणीची कापणी संपलेली असते, अशावेळी पशुधनापति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस निवडला गेला असावा, असं मिलिंद देवल यांनी सांगितलं. मार्गशीर्षातील शुद्ध प्रतिपदा म्हणजे देवदीपावली हे संस्कृती व परंपरेतील सण आपण डोळसपणानं स्वीकारायला हवेत.

        या दिवाळीपूर्वी दोन महिने आधी काही शेतकरी आपल्या बैलांना रानातला हिरवागार चारा आणि पेंड घालून धष्टपुष्ट करतात. बैल दिवाळीच्या अगोदरच्या आठवड्यापासून शेतकरी किवा गावात असलेली शाळकरी मुलं बैलांच्या शिंगांना रंगबेरंगी गोंडा लावण्यासाठी रानातून खवशीचे झाड तोडून आणतात. गोंडा तयार झाल्यानंतर त्याची विणलेली वीण आणि त्याला लावलेला रंगबेरंगी रंग फारच आकर्षक दिसतो. त्यानंतर आदल्या दिवसापासूनच बैलाच्या शिंगाना तो गोंडा बांधण्यासाठी आणि तो सहज कुणी उपटू नये यासाठी मेहनत घेतात. बैलाच्या शिंगाना गुळ आणि चुना लावून तो अधिक घट्ट चिटकेल व तो गोंडा सहजासहजी कुणालाही उपटता येणार नाही असा प्रयत्न यामागे असतो. देवदिवाळीला काही घरांमध्ये शक्यतो घराघरात वडे-मटणाचा झणझणीत बेत ठरलेला असतो. सोयरे धायरे पाहुणचारासाठी आलेले असतात. हे सजवलेले बैल ज्या पूर्वपरंपरागत खाचरात दिवाळी साजरी होते त्या ठिकाणी आणून बांधून ठेवले जातात.  गावातील आबालवृद्ध आणि आजूबाजूच्या गावातील पैपाहुणे, सगे-सोयरे त्या खाचराच्या बांधांवर हातात काठी घेऊन उभे असतात. सोडल्यानंतर मस्तवाल बैल गर्दीच्या दिशेने जर अंगावर आला तर त्याला हुसकावण्याचा प्रयत्न होतो. गाव­हाटीच्या परंपरेनुसार त्यानंतर दिवाळीला सुरुवात होते. मानक­यांच्या प्रथेनुसार एका अंगणात सर्वजण एकत्र येतात. त्याठिकाणी फुले-रांगोळीचा कना काढून त्यावर बैलांना बांधण्यासाठीचा मजबूत जाडीचा एक दोरखंड (सोल) ठेवलेला असतो. ग्रामदेवतेला गा­हाणे घालून त्याची पूजा केली जाते. त्यानंतर मानाचा बैल त्याठिकाणी आणून त्याला सोल लावून वाजंत्र्यांसोबत तो गावदेवी आणि हर हर महादेवाचा गजर करीत दिवाळीच्या खाचरात घेऊन जातात. सोलाच्या मध्यभागी बैल बांधलेला असतो तर दोन्ही बाजूने १५-२० तरबेज गडी ती सोल पकडून असतात. त्या खाचरात एका ठिकाणी मांगोळी उभारलेली असते. तो बैल त्या ठिकाणी आणल्यास त्याला बक­याचे कातडे लावलेल्या लांब काठीने हुसकावले जाते, त्यामुळे तो बैल वाजंत्र्याच्या तालावर नाचायला लागतो. बैल जर मारकुटा व रागीट असला तर तो ढुशी मारून सोलक ­यांना लोळवतो किवा खाचरात असणा­यांना शिंगाने मारायला धावतो. थोडावेळ असे केल्यानंतर त्या बैलाला बांधलेला गोंडा उपटण्यासाठी दिवाळीसाठी आलेल्या सोय­यांना बोलावले जाते. अनेकदा काही हौशी व्यक्ती स्वतःच बेधडकपणे पुढे जातात आणि बैलाशी झुंजण्याचा व गोंडा उपटण्याचा प्रयत्न करतात. काहीवेळा एखादा उत्साही गडी बैलाच्या ताकदीचा अंदाज न आल्याने जखमी होतो.  यानंतर जेव्हढे बैल दिवाळीसाठी आणलेले असतात ते एकामागोमाग एक खाचरात आणून वाजंत्र्याच्या तालावर नाचवले जातात.

     पोळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात वेगवेळ्या पद्धतीने विशेषतः पोलादपूर तालुक्यात सावित्री-कामथी-ढवळी खो­यातील हा एक महत्त्वपूर्ण कृषी उत्सव आहे, नांगर आपल्या हातात असेल, पण पुढे नांगरण्याची ताकद आणि चैतन्य बैलाच्या हृदयातून येते. ज्यांच्या घामाने मातीचे पोषण होते आणि श्रमाने शेतात रान होते आणि आशेचे बीज पेरले जाते. जेव्हा बैल पुढे जातो, आमच्या उदरनिर्वाहाचा मार्ग नांगरतो तेव्हा समृद्धी येते. एका कालातीत महाकाव्याप्रमाणे, शेतकरी आणि बैल यांच्यातील एक न बोललेल्या परंतु गहन बंधनाची गाथा कथन करतो, या सणाद्वारे ग्राम्य संस्कृती गावक­यांची एकता व केवळ उपजीविकाच नाही तर ग्रामीण भारताची भावना देखील टिकवून ठेवते. अलिकडच्या काळात तरुणाईने उदरनिर्वाहासाठी शहरांकडे धाव घेतली आहे. गावच्या गावे आणि वाड्यावस्त्या ओस पडत चालल्या असताना ही देवदिवाळी साजरी करण्यासाठी हौसेने जाणारी तरुणाई आजही मोठ्या प्रमाणात आहे. शिकल्या सावरल्या आजकालच्या पिढीला शारीरिक ताकद दाखविण्यासाठी उद्युक्त करणारा हा सण म्हणजे कदाचित वेडेपणा वाटेल परंतु आपले वाडवडील म्हणजे बळीराजा यांनी ही कृषी संस्कृती जोपासण्यासोबतच पशुधनही जोपासत आला आहे.

      – रविद्र मालुसरे (९३२३११७७०२) अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

Leave a Reply

Close Menu