सिंधु आत्मनिर्भर अभियान अंतर्गत भाजपतर्फे वेंगुर्ला तालुक्यातील वजराट गावातील हातमाग कारागीरांचा सत्कार २ ऑक्टोबर रोजी करण्यात आला. यावेळी सिंधु आत्मनिर्भर अभियान संयोजक अतुल काळसेकर, आयटी सेलचे प्रदेश संयोजक सतीश निकम, बूथ अभियान कोकण विभाग संयोजक जितेंद्र डाकी, प्रभाकर सावंत, भाजप कार्यालयीन सदस्य शरद चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, वसंत तांडेल, साईप्रसाद नाईक, सरपंच महेश राणे, उपसरपंच नितीन परब यांच्यासह हातमाग कारागिर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
खादी चळवळ ही ग्रामविकासाची चळवळ होती. या चळवळीत वजराट येथील ज्या लोकांनी हातमागावर पंचे बनविण्याचे काम गावात सुरु केले आणि तो पूर्वजांचा वारसा आज ७० वर्षानंतरही या ग्रामस्थांनी सुरु ठेवला हे पाहून, या सा-या कारागिरांचा अभिमान वाटतो. या हातमाग उद्योगाला नव्या तंत्रज्ञानाची जोड देऊन हे गाव ‘स्वयंपूर्ण हातमागाचे गाव‘ नावारुपाला येण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले.
वजराटचा पंचा प्रसिद्ध आहे. मात्र याही पुढे जाऊन येथे टॉवेल, साडी कशा बनवता येतील त्याकडे लक्ष दिला पाहिजे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खात्याकडे अनेक योजना आहेत त्याचा उपयोग करून हा हातमाग व्यवसाय नवीन तंत्रज्ञान करुन वाढवूया असे आवाहन अतुल काळसेकर यांनी केले. तर वजराट या गावात प्रत्येक घरात एक हातमाग होता. परंतु, पुढे कारागिर मिळत नसल्याने १९८४ नंतर हा व्यवसाय बंद झाला. मात्र गावात ५० ते ६० कारागीर अजूनही आहेत. त्यामुळे एखादा कारखाना होईल का या साठी उपस्थित मान्यवरांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी सतीश निकम यांनी केली.
वजराट येथील सुधाकर भोसले यांच्या हातमाग उद्योगाच्या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंगेश परब, नितीन चव्हाण, वामन भोसले यांच्यासह ग्रामस्थांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी मानले.